Breaking News

काँग्रेसचे प्रत्युत्तर; देवेंद्रजी, हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर … घोटाळा २ हजार कोटींचा, का ५ हजार कोटींचा हे आधी ठरवा- अतुल लोंढे

ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी आज पाचारण केल्यानंतर ईडीच्या या कारवाईच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर आरोप केले. त्या आरोपास उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हास्यास्पद व धादांत खोटा आहे. ज्याचा काही व्यवहारच झाला नाही, कोणालाही लाभांश मिळालेला नाही त्याची चौकशी कसली केली जाते व कोणत्या न्यायालयाचे दाखले देता असा सवाल उपस्थित करत गांधी कुटुंबाला ईडीची पाठवलेली नोटीस ही केवळ राजकीय सूडबुद्धीने पाठवलेली आहे, असल्याचा पलटवार काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना केला.

त्याचबरोबर भाजपाचे केंद्रातील नेते पाच हजार कोटींचा आरोप करत आहेत. तर फडणवीस हे दोन हजार कोटींचा उल्लेख करत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी दिल्लीतील नेत्यांशी बोलून नेमका कोणता आकडा आहे याविषयी स्पष्ट बोलावे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाचा खोटेपणाचा बुरखा फाडताना अतुल लोंढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रातील भाजपाचे नेते ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप करत आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत आहेत. आधी फडणवीस यांनी दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करून कपोलकल्पित घोटाळ्याचा आकडा निश्चित करावा. खोटे बोलले व वारंवार खोटे बोलल्याने सत्य कधी लपत नसते. भाजपा व आरएसएसच्या लोकांना खोटे बोलण्याची शिकवणच दिलेली असते. त्यामुळे फडणवीस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. नॅशनल हेराल्डला काँग्रेस पक्षाने २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले आणि अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हे कर्ज नॅशनल हेराल्ड परत करणे शक्य नसल्याने असोशिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले आणि हे शेअर ‘यंग इंडिया’ या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. हा सर्व व्यवहार पारदर्शी आहे, यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणाला लाभही झालेला नसताना घोटाळ्याचा आरोप कसा ? असा सवालही केला.

स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांच्या बाजूने असणाऱ्या भारतीय जनता पक्ष व पितृसंस्था आरएसएसला स्वातंत्र्यसैनिकांचे नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही. केंद्रातील भाजपाचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारीचा दर ९ टक्यांच्यावर गेला आहे, कर्जाचा डोंगर झाला आहे, रुपयाची घसरण सुरुच आहे, अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे, यावर भाजपाकडे उत्तर नाही म्हणून त्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विरोधकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधी व काँग्रेस व्हिक्टिम कार्ड खेळत आहे या आरोपाची खिल्ली उडवत लोंढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जात असताना भाडोत्री लोकं जमवून तुम्ही काय केले होते ? गर्दी कशाला जमवली होती ? दरेकर व भाजपाच्या ज्या लोकांवर घोटाळ्याचे आरोप झालेत त्यांनीही चौकशीला सामोरे जावे उगाच कांगावा कशाला करता? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी फडणवीसांना केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *