Breaking News

गोपीचंद पडळकर म्हणाले, तेव्हा जे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पडळकरांची प्रतिक्रिया

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या प्रश्नावरून सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तेव्हा दे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही असे सांगत तो आमचा निर्णय योग्य होता असेही मत व्यक्त केले.

मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून आंदोलन करत आहेत. न्यायालयानं हे शक्य नसून ज्यावर राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे ते घेऊन २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे देखील निर्देश कर्मचाऱ्यांना दिले. त्यानंतर देखील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं, तेव्हा सुरुवातीच्या काळात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांसोबत होते. जवळपास दोन आठवडे या दोघांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात ठिय्या मांडून जोरकसपणे मागण्या मांडल्या. मात्र, राज्य सरकारकडून वेतननिश्चिती आणि पगाराबाबत हमीचे आश्वासन मिळाल्यानंतर या दोघा नेत्यांनी आंदोलकांना माघार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर देखील आंदोलकांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर त्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तसेच सुरु ठेवले.

यासंदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, ज्या दिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो, २६ नोव्हेंबर २०२१ ला… तेव्हापासून परवा न्यायालयाचा निकाल येईपर्यंत.. तेव्हा जे आमचं ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काहीही पाच महिन्यांत घडलेलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. पण आम्ही प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली. मी आणि सदाभाऊ खोत १६ दिवस आझाद मैदानावर आंदोलकांसोबत होतो असेही स्पष्ट केले.

नंतरच्या काळात सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये कोणतीही सहमती झाली नाही आणि सरतेशेवटी हे आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनाविषयी भूमिका मांडताना म्हणाले की, जे घडलं, त्याबाबतीत पोलीस यंत्रणा तपास करेल. त्यांचा तपास होईपर्यंत यावर काही बोलणं योग्य होणार नाही.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *