शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिवसेनेचे माजी नेते आणि शिंदे गटाचे समर्थक रामदास कदम सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. परंतु रामदास कदम हे सातत्याने टीका करत असूनही त्यांच्या टीकेची दखल ना राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जाते ना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून, त्यामुळे कदम यांच्या टीकेची धार दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. त्यादिवशी बाळासाहेबांचा विषय त्यांच्यासाठी संपला. आता ते बाळासाहेब ठाकरेंचं नाव कसं काय घेऊ शकतात? बाळासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर संघर्ष करण्यात घालवलं. आता उद्धव ठाकरे त्याच शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत अशी टीका केली.
रामदास कदम हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील टीका केली.
त्यामुळे आमची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे, असं उद्धव ठाकरेंना म्हणता येणार नाही. शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकारही तुम्हाला नाही. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच आमदारही निवडून आले नसते, सगळं संपलं असतं, अशी टीकाही त्यांनी केली.
रामदास कदम यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. त्यांनीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवली, नाहीतर अजित पवारांनी सर्व शिवसेना खाऊन टाकली असती, पुढील ८ -१० वर्षात काहीच शिल्लक राहिलं नसतं असा टोलाही लगावला.