राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगत आहे. विधिमंडळ अधिवेशनात देखील याचेच पडसाद पहायला मिळाले. तस काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. तसेच ज्या राज्यात स्वत: सत्तेवर नाही अशा राज्यांमध्ये सत्तेवर असलेले सरकार घालवायचे असा एक कलमी वापर सुरु असल्याचा आरोप केंद्रातील मोदी सरकारवर केला होता. तसेच त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य आणि देशपातळीवर सातत्याने केंद्रातील भाजपा सरकारवर टीकास्र सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, आजकाल ही फॅशन झालीये की तुम्ही जेव्हा कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाहीत, तेव्हा अशी टीका करायची. मोदींच्या कामाचा आवाका एवढा मोठा झालाय आणि ज्या प्रकारची कामं त्यांनी केली आहेत, की त्याचं कोणतंही उत्तर हे विरोधक देऊ शकत नाही असा खोचक टोला लगावला.
मी विरोधकांना एवढाच सल्ला देईन की मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या पाच सप्टेंबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह राज ठाकरेंचीही भेट घेणार असून त्यामध्ये भाजपा-मनसे युतीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अमित शाह गणेश दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले.
दरवर्षी गणेशोत्सवात अमित शाह मुंबईत येतात. काही गणपतींचं ते दर्शन घेतात. लालबागचा राजा, आशिष शेलार यांच्या गणपतींचं दर्शन घ्यायला ते जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही ते गणपती बाप्पांच्या दर्शनाला येतील. आमचे वरिष्ठ नेते येतायत तर त्यांच्यासोबत एक बैठक व्हावी अशी आम्ही विनंती केली होती. त्यासाठीही त्यांनी वेळ दिला आहे. एका शाळेचंही ते उद्घाटन करणार आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे. मुंबईशी त्यांचं वेगळं नातं आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी विरोधकांना एवढाच सल्ला देईन की मोदींनी विकासाची जी एक रेषा तयार केली आहे ती खोडण्याऐवजी तिच्याबाजूला एक त्याहून मोठी रेषा आखण्याचा प्रयत्न करा”, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.