मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संवादाचा मार्ग सुरु होईल म्हणून आस्ते कदम घेतलेल्या प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हे बंड नसून उठाव आहे’ या बंडखोरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन टीका करताना उठावमधील उठा हा उध्दव ठाकरे आहे असा टोला बंडखोरांना लगावत तुम्हाला उठविणारच असा इशारा दिला. तसेच महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वातच नसल्याची टीकाही केली.
तिरडी उठते, राजकीय म्हणतोय. नाहीतर परत म्हणतील आमचे मुडदे आले वगैरे वगैरे. तर नाही तुम्हाला या राज्याची जनता उठवणारच आहे असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय तो पैसे आणि खोके देऊन मिळत नाही आम्हाला. सध्या आदित्य ठाकरेंचा दौरा सुरुय महाराष्ट्राभरात. आपण पाहत असाल जिथे जिथे ते जातात तिथे शिवसैनिक जमतात. रस्त्यावर उतरुन त्यांचं स्वागत करतात. पैसे देऊन आणलेले, फोडलेले लोक नाहीत. हे बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी जनता असल्याचेही ते म्हणाले.
त्यानंतर राऊत यांनी उठाव शब्दावरुन शाब्दिक कोटी करत बंडखोर उठाव म्हणत असतील तर त्या उठावमधील उठा हा उद्धव ठाकरे आहे, असं म्हटलं. काय उठाव? उठावमधला ‘उठा’ हा ‘उद्धव ठाकरे’ आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अरे बापरे सरकार कोणाचं आहे. महाराष्ट्रात सरकार अस्तित्वातच नाहीय. एक महिना होत आला तरी सरकारचं अस्तित्व दिसत नाहीय. दोघाचं मंत्रिमंडळ आहे. अजूनही चाचपडतायत सरकार बनवण्यासाठी आणि दुसरीकडे मोठे मोठे निर्णय घेतायत. ते निर्णय सुद्धा बेकायदेशीर आणि असंविधानिक आहेत, इतकेच मी सांगू शकतो अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
ही एक अस्वस्थ करणारी घटना आहे. मराठी माणसाच्या हृद्याला घरं पाडणारा हा प्रसंग आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्वाचा विचार घेऊन ही संघटना पुढे गेली. या संघटनेवर फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची हे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्देव नाही अशा शब्दांमध्ये राऊत यांनी खंत व्यक्त केली. बंडखोरांना बाळासाहेबांची शिवसेना दिल्लीश्वरांच्या आदेशाने संपवायची असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपण फुटलेला आहात, फुटीर आहात तर आपण आपल्याला नव्या संसारात सुखाने राहा. पण दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायची आहे. त्यांचं हत्यार म्हणून महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणासाविरुद्ध हे (बंडखोर) वापरले जातायत असे सांगत जे लोक बंड करुन गेलेत त्यांना माझं आवाहन आहे की जिथे आहात तिथे आरामात रहा. आपला गट बनवा. पण तुम्ही शिवसेनेला आव्हान देत आहात. खरी शिवसेना, खोटी शिवसेना अशा वार्ता करता असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मराठी माणसाच्या हृदयात या शिवसेनेला स्थान आहे. आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणता हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातलेत, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले, शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणलीय. त्यांना या राज्याची जनता माफ, आई जगदंबा आणि नियती माफ करणार नाही असेही ते म्हणाले.