उत्तर प्रदेशातील शेवटच्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. हा प्रचार चांगलाच रंगलेला असून यात शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नेते आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशात आले. तेथील उमेदवाराच्या आयोजित प्रचार सभेत बोलताना म्हणाले, जनता कर्फ्युच्या काळत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांची सगळी काळजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली. तसेच या सर्व कामगारांना त्यांच्या घरी परतण्यासाठी केंद्राकडे रेल्वे सोडण्याची मागणी केली. जेव्हा रेल्वे सोडली तेव्हा त्याचे पैसेही रेल्वेने घेतले. कामगारांच्या तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री फंडात दिले गेले असून हे सारे फक्त निवडूकीसाठी केले नव्हते तर उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारांशी असलेले बंधुत्वाचे नाते असल्याने केल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला अप्रत्यक्ष उत्तर दिले.
उत्तर प्रदेशात शिवसेनेकडून ३९ उमेदवार उभे केले आहे. यातील शेवटच्या टप्प्यातील ७ मार्च रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे. शिवसेनेच्या डुमरिया गंज येथील उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे आले. त्यावेळी ते बोलत होते.
जनता कर्फ्यु लावण्यात आल्यावर उत्तर प्रदेश, बिहारचे जे नागरिक मुंबईत राहत होते, त्यांना आपल्या गावी, आपल्या आईवडिलांकडे, परिवाराकडे परतायचं होते. रेल्वे स्थानकांवर गर्दी जमली होती, रेल्वे कधी सुटणार याची ते वाट बघत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा केंद्र सरकारला सातत्याने फोन करत होते की उत्तर प्रदेश, बिहारच्या बांधवांना आपल्या घरी जायचे आहे, त्यामुळे रेल्वे सोडा. मात्र तरीही भारत सरकारने १ मे पर्यंत रेल्वे बंद ठेवल्या. हे किती लाजीरवाणे आहे? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
सगळे लोक रस्त्याने हे चालत जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांना भावनिक आवाहन केले, आम्ही काळजी घेतो असे सांगून त्यांना परत न जाण्याचं आवाहन केले. जेवण, राहणं, आरोग्यसुविधा या सगळ्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. यातूनही जेव्हा रेल्वे सोडण्यात आल्या तेव्हा लाजिरवाणी गोष्ट अशी की रेल्वेने तिकीटाचेही पैसे मागितले. तेव्हा हे तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री रिलीफ फंडातून देण्यात आले. हे निवडणुकीसाठी नव्हतं. हे एक प्रेमाचं, बंधुत्वाचं नातं होतं अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केली.