Breaking News

हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार…मग भुकेचा प्रश्न सुटणार का? शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा आहे - शरद पवार

हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार… आणखी कुणाच्या नावाने करणार…या सगळ्या चर्चा… मागण्या याने बेकारीचा प्रश्न… भुकेचा प्रश्न सुटणार आहे का?…आज काही दिवस आपण बघतोय जात – धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत लोकांचा मुलभूत प्रश्न काय आहे तर महागाईचा… अन्नधान्याचा… बेरोजगारीचा… सन्मानाने जगण्याचा आहे… या प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नाही. काही लोक भलत्याच मागण्या करताना दिसत आहेत. त्यामुळे आपण संभ्रमात पडतो. या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची भूमिका घ्यायची असेल तर शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हाच ख-या अर्थाने आपल्याला दृष्टी आणि शक्ती देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने कृतज्ञता गौरव सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराती यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. आज टेलिव्हिजनवर काही दिवस काय बघतोय तर कुणाची सभा आहे…हे करणार ते करणार… हनुमानाच्या नावाने करणार… आणखी कुणाच्या नावाने करणार…या सगळ्या चर्चा… मागण्या याने बेकारीचा प्रश्न… भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का? असा सवाल करतानाच मुळ प्रश्नाला बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतः चा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शाहू – फुले – आंबेडकरांचे नाव घेतो म्हणून एका नेत्याने टिका केल्याचा उल्लेख करताना मग नावं कुणाची घ्यायची असा सवाल करत शाहू – फुले आंबेडकरांचे नाव का घेतो याबाबतची माहिती शरद पवार यांनी दिली. आज श्रीलंकेत दंगा सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना जावं लागलं. मात्र हिंदूस्थान एवढा मोठा देश आहे. अनेक भाषा… अनेक जाती आहेत. त्यामुळे हा एकसंघ राहिला याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे असेही ते म्हणाले.
विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलच्यावतीने २८ मागण्या करण्यात आल्या. त्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांच्यासमवेत सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड उपस्थित राहून बैठक घेऊ असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी शरद पवार यांनी या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना मजबूत हवी आणि या मजबूत संघटनेला हिरालाल राठोडसारखा नेता हवा अशा शब्दात स्तुती केली.
शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांनी आपण काम करत राहिले पाहिजे. संघटनेने या सर्व घटकांना त्या दिशेने न्यायचे आहे. हे काम केलात तर लवकर आपली नवी पिढी ही शिक्षित होईल… समृध्द होईल… न्यायासाठी प्रसंगी संघर्ष करेल व आपले मुलभूत अधिकार आपल्या पदरात पाडून घेऊन जीवनमान बदलेल तसा प्रयत्न करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असेल्याचेही त्यांनी सांगितले.
या देशात पिढ्यानपिढ्या कसं वागलं पाहिजे याचे सूत्रसंचालन केले गेले… वर्णभेद केला गेला. हे भेदायचे असेल तर आरक्षण पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आज व्हिजेएनटीच्यावतीने अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही मागणी रास्त आहे. शिक्षणाने सुवर्णसंधी मिळते. जो शिक्षणाची कास धरतो त्याचा उध्दार होतो. वंचितांच्या मागे उभे राहण्याची कल्पना… भूमिका पवारसाहेबांची राहिली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपण केलेल्या मागण्यांचा सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करु असे सांगतानाच सेलची बांधणी मजबूत करा. ताकदीने राहिलो तर अधिक शक्ती निर्माण होईल राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असे आश्वासन त्यांनी दिले.
या देशात आरक्षणावर घाला घातला जात आहे. आरक्षणाला शह देण्याचा प्रयत्न मनुवादी लोक करत आहेत त्यासाठी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
याशिवाय माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, सेलचे अध्यक्ष हिरालाल राठोड यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी विमुक्त जाती, भटक्या जमाती मागासवर्गीय सेलने आदरणीय शरद पवारसाहेब यांचा फेटा, मोत्याची माळ व कोल्हापूरी चप्पल भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अरुण गुजराथी यांचाही सन्मान केला.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *