मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत असताना अजित पवारांवर टीका केली. तसेच त्यांची मिमिक्रीही केली. याबाबत आज अजित पवारांना यासंदर्भात विचारला असता अजित पवार यांनी राज ठाकरेंनी मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते, मिमिक्री हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार असल्याचे सांगत खिल्ली उडविली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते? मिमिक्री हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण जनतेने त्यांना नाकारले. त्यांनी मागे एकदा निवडणुकीत १४ आमदार निवडून आणले. दुसऱ्यांदा फक्त एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरदराव सोनावणेंनी त्यांचे तिकीट घेतले म्हणून तेवढी एक पाटी लागली. नंतर आमचे कल्याणचे सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत जे लोक होते, त्यांपैकी काही लोक सोडले तर सगळे त्यांच्यापासून दूर गेले आहेत याची आठवणही करून दिली.
तसेच अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढविण्याऐवजी अजित पवारची मिमिक्री करणे आणि अजित पवारचे व्यंगचित्र काढणे यात समाधान वाटते आहे. यामधून राज ठाकरे समाधानी होत असतील, तर त्यांना शुभेच्छा, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले.
दरम्यान, काल रत्नागिरीतील जाहिर सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, अजित पवार हे शरद पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी जसे वागत होते, ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिले. ‘ए तू गप्प बस’, ‘ए तू शांत बस’, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असे सगळे त्यांचे सुरू होते. हे सगळे पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होते.
अजित पवार जे काही वागले ते सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आले असणार, अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवार) असा वागतोय. खरेच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मलापण म्हणेल, ए गप्प बस. त्या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको, असे म्हणत त्यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.