महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी ६ मे रोजी रत्नागिरीत सभा पार पाडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. शरद पवार यांच्या तोंडून कधीही शिवरायांचं नाव येत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याची घेतलेल्या मुलाखतीतील उत्तराची आठवण करून दिली.
राज ठाकरे म्हणाले, २०१४ साली भाजपाचं सरकार राज्यात आलं. त्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार होतं. तेव्हा कोणाच्या तरी डोक्यात खूळ आलं की, अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक बांधायचं. त्यावर मी काय बोललो? ते राहिलं बाजूला. पण, राष्ट्रवादीच्या लोकांनी पसरावयाला सुरुवात केली की, राज ठाकरे शिवरायांच्या स्मारकला विरोध करतो आहे. मी शिवरायांच्या स्मारकाला विरोध का करेन?, असा सवाल केला.
जो पक्ष, ज्या पक्षाचा अध्यक्षांनी परवा दिवशी राजीनामा दिला आणि आत्ता असलेले. या माणसाच्या तोंडून म्हणजे शरद पवारांच्या कधीही शिवरायांचं नाव येत नव्हतं. त्यांची भाषणं काढून बघा तुम्ही. शाहू, फुले आंबेडकर हीच नाव आहेत. ते तर मोठे होतेच, त्याबाबत काही वाद नाही. पण, सर्वप्रथम आमच्या शिवरायांचं नाव घेतलं पाहिजे. ती आमची ओळख आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, मी शरद पवार यांच्याबरोबर १९९१ सालापासून आहे. शरद पवार अनेकवेळा शिवाजी महाराजांचं नाव ते घेतात. त्यांच्या इतिहासाची उजळणी सुद्धा करतात.
मात्र, राज ठाकरेंनी शरद पवारांची एक प्रकट मुलाखत घेतली होती. त्यात राज ठाकरेंनी हाच प्रश्न शरद पवारांना विचारला होता. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं होतं, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे आहेत. पण, फुले, शाहू, आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीत मोठं काम केलं. सर्व महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे आवश्यक आहे, असं शरद पवारांच्या विधानाचा दाखला छगन भुजबळांनी दिला.