भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत हे १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या असून बोलणीही सुरु आहे, असा दावा आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला. नितेश राणे याच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना नितेश राणेंच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं असता, आज हास्यदिन आहे. त्यामुळे अशा विषयावर न बोललेलंच बरं, असं म्हणत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी कर्नाटक दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करताना म्हणाले, ५० खोके वाले आज ४० टक्क्यांसाठी कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचाराला गेले आहेत. खरं तर तिथे जाऊन त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांशी संवाद साधायला हवा होता, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिशी त्यांनी उभं राहायला हवं होतं. मात्र, मिंधे ते मिधेंच. केवळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी ते आपल्या बॉसचं ऐकून भाजपाच्या प्रचारासाठी गेले, अशी टीका केली.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून यापुढे त्यांची वज्रमूठ सभा होणार नाही, अशी टीका भाजपा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य करताना म्हणाले, विरोधकांना वज्रमूठ सभेचा धक्का बसला आहे. त्यामुळे ही सभा होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, खारघर सारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून वज्रमूठ सभा उन्हाळ्यानंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे स्पष्ट केले.