मराठी ई-बातम्या टीम
मुंबईसह राज्यातील सर्व दुकानावरील पाट्या मराठीतच लावण्यासंदर्भातील निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नुकताच घेतला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांकडून मराठी नामफलकाच्या बाबत घेतलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्यास सुरुवात केली असल्याचे दिसताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज गर्जना करत म्हणाले की, मराठीतच नामफलक असण्यासंदर्भातच्या निर्णयाचे श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे असून बाकी कुणीही त्याचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये असा सज्जड इशारा देत त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच असे स्पष्ट करत या सर्व निर्णयाचे श्रेय मनसेचे असल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात राज ठाकरे यांनी ट्विटरवरून यासंदर्भात राज्य सरकारचे अभिनंदन करत एकाबाजूला सरकारला आणि शिवसेनेलाही इशारा दिला.
ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरतरं आंदोलन कराव लागूच नये. परंतु २००८ आणि २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलन केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतली आणि शिक्षाही भोगल्याची आठवण त्यांनी करून दिली.
काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं दुकानावरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याच श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं आहे. त्या सर्वांच मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच असे सांगत शिवसेनेला एकप्रकारे त्यांनी मराठीच्या मुद्यावरून इशारा दिला आहे.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारचही अभिनंदन करत सरकारला आता मी इतकंच सांगेन की, आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ह्यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे की, मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकावर चालतील म्हणून, ह्याची काय गरज आहे असा सवाल महाविकास आघाडीला करत महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारला दिला.
#राजभाषा_मराठी #महाराष्ट्र_धर्म pic.twitter.com/MQhQ4DGcvk
— Raj Thackeray (@RajThackeray) January 13, 2022