राज्यसभा निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषद निवडणूकीचा बिगूल वाजला. या निवडणूकीत शिवसेनेकडून विद्यमान मंत्री सुभाष देसाई यांचा पत्ता कट त्यांच्याऐवजी सचिन अहिर यांना तर दिवाकर रावते यांच्या जागेवरून आमश्या पाडवी अशा दोन चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मंत्री सुभाष देसाई यांना निवडणूक का लढवित नाही याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी खुलासा केला.
सुभाष देसाई म्हणाले, मी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून उमेदवार ठरवतो. हे उमेदवार नेते मंडळी ठरवत असतात आणि मी त्या प्रक्रियेत आहे. उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत मीच असल्याने विधान परिषद निवडणूक न लढवणं हा माझा निर्णय आहे. मी यावेळी विधान परिषद निवडणूक लढणार नाही.
शिवसेनेच्या दोन जागा आहेत. या दोन जागांवर शिवसेना दोन उमेदवार देत आहे. कोण निवडून येतो हा विषय माझ्यासाठी गौण आहे. शिवसैनिक निवडून येतो आहे हा मोठा समाधानाचा विषय आहे असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह लहान-मोठ्या सर्व पक्षांची चर्चा झाली आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारने ठरवलेले सर्व उमेदवार निवडून येतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
औरंगाबादचे पालक मंत्री पद सुभाष देसाई यांच्याकडे असून आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सभा औरंगाबादेत होत आहे. यापार्श्वभूमीवर ते सभास्थळाची पाहणी कऱण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत मोठ्या प्रमाणावर भाजपाकडून बॅनरबाजी करण्यात आली. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजपाने मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी केली आहे. मोर्चे काढणे, आंदोलन करणे, विरोध दर्शवणे ही विरोधी पक्षाची कामं आहेत. आम्ही विरोधी पक्षात असताना आम्हीही अशी कामं केली आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, शिवसेना अशा गोष्टींना कधीच घाबरत नाही.
औरंगाबादचे संभाजीनगर या संदर्भात बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, औरंगाबाद शहराचे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केलेले आहे. आताही संभाजीनगरच आहे. कागदोपत्री काही गोष्टी राहिल्या असून त्याही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतील. मात्र, आता औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगरच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा विराट होणार आहे. या सभेला हे मैदान पुरणार नसल्याने औरंगाबाद शहरातील विविध मैदानांमध्ये मोठ्या स्क्रीनद्वारे सभेचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, सभेचे पूर्ण नियोजन झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही सभा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.