मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीवर असूनही त्यांना मेस्मा कायद्याच्या खाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याप्रश्नावर शिवसेनेने आज सकाळपासूनच विधानसभेचे कामकाज रोखून धरत दिवसभर गोंधळ घालण्यात येत होता. मात्र दुपारनंतर शिवसेनेने सरकार विरोधातील आपला रोख बदलत या मेस्मा कायद्यास आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे सुनिल प्रभू आणि भाजपचे अतुल भातखळकर, आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे भाजप विरूध्द शिवसेना असे असलेले चित्र क्षणाधार्थ काँग्रेस विरूध्द भाजप-सेना असे वेगळेच निर्माण झाल्याचे विधानसभेत पाह्यला मिळाले.
अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याखाली आणल्याच्या विरोधात शिवसेनेने जवळपास सहावेळा विधानसभेचे कामकाज बंद पांडले. मात्र त्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी सभागृहाचे पुढील कामकाज पुकारत अर्थसंकल्पातील विभागवरील चर्चेला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेसचे जयकुमार गोरे हे बोलत असताना अंगणवाडी सेविकांचा प्रश्न उपस्थित केला. तरीही शिवसेनेच्या सदस्यांकडून गोंधळ तसाच सुरु होता. या गोंधळात आपल्याला भाषण करता येत नसल्याने अध्यक्षांनी संरक्षण देण्याची मागणी केली. नेमक्या त्याच कालावधीत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्यावरून शिवसेना ही सत्तारूढ पक्ष असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत
शिवसेनेने पहिल्यांदा सत्तेतून बाहेर पडावे मगच सभागृहात असे आंदोलन करावे अशी मागणी केली. तसेच सभागृहात महत्वाच्या खात्यांच्या अनुदानावर विरोधकांना चर्चा करायची असताना सत्तेत असलेल्या सेनेने गोंधळ घातला आहे. विरोधकांचा वेळ का खाताय असा संतप्त सवालही ठाकूर यांनी केला.
त्यामुळे शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू हे चिडले आणि त्यांनी आपल्या गोंधळाचा रोखच बदलत काँग्रेसच्या कार्यकाळातच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ही अवस्था झाली असून हे काँग्रेसचेच हे पाप असल्याचा आरोप केला. त्यांनतर काँग्रेसचे सदस्य ही आपल्या बाकांवरून उठले.
त्यातच भाजपच्या आशिष शेलार यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काँग्रेसच्या काळात कशी वागणूक देण्यात आली याविषयी सभागृहात माहिती देत काँग्रेसच्या काळातच अंगणवाडी सेविकांना केवळ दीड हजार रुपये मानधन मिळत होते .तर भाजप सरकारने त्यांचे मानधन साडेसहा हजार रुपये केल्याचे सांगत काँग्रेसवर निशाना साधला. यावर कढी करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ज्या मेस्मा कायद्याचा उल्लेख होतो आहे. तो मेस्मा कायदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लागू केल्याचे सांगत या कायद्याला सर्वस्वी काँग्रेसचं जबाबदार असल्याचा आरोप केला. अखेर या गोंधळातच भाजपच्या इतर सदस्यांनीही काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.
त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आपला रोख काँग्रेसच्या विरोधात वळविला. शिवसेनेच्या वळविलेल्या रोखाचा फायदा भाजपच्या आमदारांनी घेत त्यांनीही काँग्रेस विरूध्द भाजप असे चित्र निर्माण केले. त्यामुळे क्षणभर सभागृहात कोण कोणाच्या विरोधात आहे? हे स्पष्ट होत नव्हते.