मराठी ई-बातम्या टीम
सुपर मार्केट मधून वाईन विक्रीला परवानगी दिल्यापासून भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत असतानाच आज प्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराड यांनी या निर्णयावरून टीकेची झोड उडवित साताऱ्यात आंदोलन केले. बंडातात्यांच्या या टीकेचा समाचार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेत म्हणाले की, वाईन विक्रीला दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली. मात्र असे केल्याने वाईनचा खप वाढणार नाही की, कमी होणार नाही. किर्तनाने माणूस सुधारत नाही ना तो लावणीने बिघडतो. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे असे सांगत अप्रत्यक्ष बंडातात्यांना टोला लगावला.
वाईनला विक्रीला राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांचे हीत असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाईनचा विषय अनावश्यक चर्चेला आणून शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे शेट्टी यांनी सांगत वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे केल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक हा विषय चर्चेमध्ये आणत आहे. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे, त्यामुळे हे सर्व वेळीच थांबायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान यावेळी बोलताना शेट्टी यांनी पोलिसांच्या बदल्यावरून सध्याच्या सरकारवर जे आरोप होत आहेत त्यावर बोलताना म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यावरूनच होत असतात. यापूर्वी देखील अनेकवेळा झाल्या आहेत. मात्र आता यामध्ये बदल झाला पाहिजे, पोलीस बदल्यांसाठी एक नियमावली निश्चित करण्यात यावी, तरच हा बदल्यांचा धंदा बंद होईल असेही स्पष्ट केले.
वर्षभरापेक्षाअधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर तीन कृषी विधेयक मागे घेण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. मात्र या सर्वांमध्ये ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.