Breaking News

राज्यसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर, हे खासदार झाले निवृत्त १० जून २०२२ रोजी मतदान तर त्याच दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर

राज्यसभेतील महाराष्ट्रातील ६ जागांसह रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झालाय. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश असून यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे.
निवडणूक होत असलेल्या ५७ राज्यसभा खासदारांची मुदत २१ जून ते १ ऑगस्ट या काळात संपत आहे. यात १५ राज्यांमधील खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या ६ खासदारांची मुदत ४ जुलै २०२२ रोजी संपत आहे.
भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, काँग्रेस नेते पी. चिदंबरम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, भाजपाचे विकास महात्मे, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाचे विनय सहस्त्रबुद्धे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहिर केल्याप्रमाणे या निवडणूकीची अधिसूचना अर्थात नोटिफिकेशन – २४ मे २०२२ रोजी जाहिर होणार आहे. तर उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – ३१ मे २०२२, उमेदवारी अर्जाची छाननी १ जून २०२२ रोजी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ३ जून २०२२ राहणार असून मतदानाची तारीख -१० जून २०२२ निश्चित करण्यात आले असून
सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार असून मतदानाच्या दिवशीच संध्याकाळी मतमोजणी होवून निकाल जाहिर करण्यात येणार आहे.
दरम्यान, सहा राज्यांमधील १३ राज्यसभेच्या जागांसाठी मागील द्वैवार्षिक निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपाला एक जागा गमवावी लागली. तथापि, भाजपाने तीन ईशान्येकडील राज्ये आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागा जिंकली, जिथे सर्व पाच सदस्य विरोधी पक्षांचे होते. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पाचही जागा जिंकल्या आहेत.
राज्यसभेच्या वेबसाइटवर नवीन आकडेवारी अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या जागा जोडल्या गेल्यास, वरच्या सभागृहातील सदस्यांची संख्या १०० वर पोहोचेल. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे की, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आसाममधून राज्यसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या. ईशान्येतील अन्य दोन जागा, त्रिपुरा आणि नागालँड याही भाजपाने जिंकल्या आहेत. आतापर्यंत येथे ४/४ निकाल लागला आहे. भाजपाचे आता राज्यसभेत १०० सदस्य आहेत. २०१४ मध्ये राज्यसभेत भाजपाची संख्या ५५ होती आणि तेव्हापासून अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळवल्यामुळे ही संख्या सातत्याने वाढत आहे.
राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ घटले त्यांचे २९ सदस्य आहेत. तर, तृणमूलचे-१३, डीएमके- १०, बीजेडी-९, आम आदमी पार्टी-८, टीआरएस-६, वायएसआरसीपी-६, एआयएडीएमके-५, राजद-५ आणि एसपी-५ सदस्य आहेत.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *