Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंकडून गडकरींना धन्यवाद देत बाकीच्यांना लगावला टोला ३ मे नंतर लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनासारख्या संकटकाळात पक्षबाजूला ठेवून राज्य सरकारसोबत या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींजी आपण केलात. या आवाहनाबद्दल तुमचे खरेच धन्यवाद. मात्र अशा संकटसमयीही इतर जे कोणी घाणेरडे राजकारण करत आहेत, त्यांना यामुळे काही काळ तरी वेळेचे भान येईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा नेत्याकडून राज्यात सुरु असलेल्या राजकारणाबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
सध्याच्या कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.
तसेच राज्यातील परिस्थितीची पाहण करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने निष्पक्षपातीपणे परिस्थितीची पाहणी करावी असा इशारा देत केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या छुप्या राजकारणावर त्यांनी टीका केली. यावेळी एकजूटीने लढण्याची गरज असल्याचे हिंदी भाषेतून सांगत अरे उपरवाले है जरा वो भी तो सुने असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही राजकारण करण्याचे या परिस्थितीत तरी सोडा असे अप्रत्यक्ष आवाहन केले.
राज्यातील लॉकडाऊनच्या संदर्भात ३ मे नंतर त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरंसमध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल असे सांगत सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादन ही केले.
कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल -नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे. कापुस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन
राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले.
आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी,सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
इतर राज्यातील कामगार-मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत, लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मदतीच्या हातांचे आभार
मुख्यमंत्र्यानी टाटा, रिलायन्स, विप्रो, महेंद्र ॲण्ड महेंद्र, बिर्ला, या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेऊन राज्याला खुप मदत केल्याचा आवर्जुन उल्लेख केला व त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी राजस्थान येथे कोट्यात अडकले आहेत त्यांना ही आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुंबई – पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही
मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. विषाणु घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोकांमध्ये विषाणुचे लक्षणे दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे -समाजातील अंतर वाढवणे नाही असे स्पष्ट करत २० टक्के लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे विषाणुचा गुणाकार रोखण्यात यश परिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणुच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत. रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे. यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेऊन आहोत, यासंदर्भातील एका सुद्धा विषयाकडे आपले दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचे कौतूक होत आहे, आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी, संयम अतुलनीय असल्याचे ते म्हणाले.
मृत पोलीसांच्या कुटुंबाना सर्व मदत
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी तसेच उपचारांची पराकाष्ठा करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा सवाल केला जातो. परंतू आज हेच पोलीस दिवसरात्र सेवा देत आहेत, दुर्देवाने दोन पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन पोलीसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहीलच, त्यांना सर्व मदत ही देईल पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका कारण पोलीस असतील, डॉक्टर, नर्सेस असतील आरोग्य कर्मचारी असतील हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत.
कोरोना झाला म्हणजे गेला असं अजिबात नाही
कोरोना झाला म्हणजे गेला असे अजिबात नाही. ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षांच्या लोकांपर्यंत रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर घरीच उपचार न करता फिव्हर रुग्णालयात दाखल व्हा, अंगावर दुखणे काढू नका अशी कळकळीची विनंती ही मुख्यमंत्र्यांनी केली. नॉन कोविड रुग्णांसाठी खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, शासन त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करील असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *