मुंबई : प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण दिल्लीतील आणि आजूबाजूच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर नागरीक चांदनी चौक आणि लाल किल्ला परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येत असतात. कोरोनामुळे आता थोडीशी परिस्थिती वेगळी असली तरी या परिसरात १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिना निमित्त आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त नागरीक येतच असतात. मात्र यंदाच्यावर्षी लाल किल्ल्याला कंटेनरची तटबंदी पहिल्यांदाच लावण्यात आली. त्यावरून राज्याचे उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत मुघलांनीही इतकी तटबंदी केली नव्हती असा उपरोधिक टोलाही लगावला.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही महत्वाच्या दिवशी हा परिसर हाय अलर्टखाली असतो. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असतो. मात्र या दोन्ही दिवशी लाल किल्ल्याला कंटेनरची तटबंदी कधी घालण्यात आली नव्हती. परंतु या वर्षी पहिल्यांदाच उंचच उंच लाल किल्ल्याच्या उंची इतकी कंटेनरची तटबंदी घालण्यात आली.
अफगाणीस्तान मध्ये सध्या सुरु असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ही तटबंदी उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान लाल किल्ल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर तटबंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार नेमके कोणते उद्दीष्ट साध्य करू पहात आहे अशी चर्चाही दिल्लीत सुरु झाली आहे.
मुघलांनी सुद्धा कधी इतकी तटबंदी केली नव्हती. pic.twitter.com/gpjzbseFHb
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) August 15, 2021