विधान परिषद निवडणूकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींकडून दोन उमेदवारांच्या नावाला संमती दर्शविली आहे. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अशोक भाई जगताप आणि थोडेसे अडगळीत पडलेले चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडूण जाणाऱ्या विधान परिषद निवडणूकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यातच काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सतत वाद होत असल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर झिशान शेख यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्याबाबतची तक्रारही केली होती. त्यानंतर भाई जगताप यांचे पदही जाणार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरु झाली होती. मात्र जगताप यांना पदावरून हटविले गेले नाही.
त्यानंतर काँग्रेसमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दोन दलित चेहऱ्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेले चंद्रकांत हंडोरे यांनाही काँग्रेसने संधी दिली आहे.
मध्यंतरीच्या काळात चंद्रकांत हंडोरे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भाजपाने हंडोरे यांना प्रवेश दिला नाही. त्यातच हंडोरे हे गुरूदास कामत यांच्या गटाचे असल्याने आणि कामत यांचेच निधन झाल्यानंतर हा गट काहीसा काँग्रेसच्या मुख्य प्रहावापासून वेगळा पडला गेला होता. त्यातल्या त्यात कामत गटाचे अमरजीत मनहास यांना मुंबई काँग्रेसच्या कार्यकारणीत सामावून घेण्यात आले. आता हंडोरे यांनाही विधान परिषदेसाठी उमेदवारी देत त्यांनाही संधी देत कामत गटाला सक्रिय करण्याचा प्रयत्न काँग्रेस श्रेष्ठींकडून झाल्याचे दिसून येत आहे.
विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशनुसार या दोघांच्या नावांना मान्यता दिली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी या माहितेचे परिपत्रक काढले आहे.
काँग्रेसकडून मोहन जोशी, सचिन सावंत, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ यांच्या नावांची चर्चा होती. अखेर दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावं निश्चित करण्यात आलं आहे.
मात्र नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्ये अडगळीत पडल्याची चर्चा काँग्रेस अंतर्गत असून त्यांनाही या निवडणूक बाजूला सारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.