मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. परंतु माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने विरोधकांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवाजाने माझे कान बधीर झाल्याचे सांगत विरोधकांना टोला लगावला.
विधानसभेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कामकाज विधानसभेचे पटलावर अध्यादेश ठेवले. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज रेटून नेण्याशिवाय सत्ताधाऱ्याना पर्याय नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोंधळातच शोक प्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांच्यासमोरील माईकमधून आवाजच बाहेर येईना. त्यामुळे भाजपाच्या आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना हाताने इशारा करत मोठ्याने बोलण्याची सूचना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आवाजाने माझे कान बधीर झाल्याचा उपरोधिक टोला विरोधकांना लगावला.