मुंबईः विशेष प्रतिनिधी
अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या कामकाजास सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा मुद्दा व महिला अत्याचारांच्या वाढत असलेल्या घटनांप्रश्नी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच हेक्टरी २५ हजार रूपये मदतीची मागणी करत या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विधानसभेत केली.
मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी फेटाळून लावत पुढील कामकाज पुकारले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभाग, पणन विभाग, अर्थविभागाचे असे मिळून ६ अध्यादेश पटलावर ठेवले. त्याचबरोबर २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.
या दरम्यान विरोधकांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, २५ हजार हेक्टरी मदत द्या, महिला अत्याचार विरोधी कायदा आणा अशा घोषणा देवून सरकारचा धिक्कार करत गोंधळ सुरुच ठेवला. शेवटी शोक प्रस्ताव पुकारण्यात आल्यानंतर विरोधक शांत झाले. माजी आमदार पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत यांना आदरांजली वाहून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.