Breaking News

मुख्यमंत्र्यांचे आवाहन, कोरोना वाढतोय, मास्क वापरा; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार

कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी १.५९ टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये २७.९२ टक्के तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के इतकी वाढ झाली आहे.
सध्या केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १८ रुग्ण ऑक्सिजनवर आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी सावधगिरी बाळगणे आणि त्यासाठी मास्क घालत राहणे, लस घेणे आवश्यक आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्या १८ पेक्षा अधिक वयाच्या ९२.२७ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून ते वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
………………….
सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७, मधील ३ हजार ५०० चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इ. सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी ५०० मुलांचे व ५०० मुलींचे स्वतंत्र निवासी वसतीगृह देखील विकसित करण्यात येईल.
याअंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर ३७, मधील ३५०० चौ.मी.क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.
—–०—–
राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक
राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात २५ मे अखेर ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षी याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठ्याचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपायोजना राबविण्यात येत आहेत. सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात १९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात ३ हजार ३२७ द.ल.घ.मी. म्हणजे ४५.१३ टक्के, कोकण विभागात १५६७ द.ल.घ.मी. म्हणजे ४४.६५ टक्के, नागपूर विभागात १६२० द.ल.घ.मी. म्हणजे ३५.१८ टक्के, नाशिक ‍विभागात २१३८ द.ल.घ.मी. म्हणजे ३५.६२ टक्के तर पुणे विभागात ४३८१ द.ल.घ.मी. म्हणजे २८.८ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.
तसेच टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. याअंतर्गत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यात कोकण विभागात १५५ गावांना आणि ४९९ वाड्यांना १०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाड्यांना १०२ टँकर्स, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाड्यांना ७० टँकर्स, औरंगाबाद विभागात ४३ गावे, २३ वाड्यांना ५९ टँकर्स, अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकर्सची आवश्यकता भासलेली नाही.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये ५३ ने आणि वाड्यांमध्ये ११६ ने वाढ झाली आहे. तसेच टँकर्समध्ये ४६ ने वाढ झाली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ४०१ टँकर्समध्ये ८९ शासकीय आणि ३१२ खाजगी टँकर्सचा समावेश आहे.
——०——
हरभऱ्याची खरेदी २८ जून पर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु
या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून ३२.८३ लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना ८.२० लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी २८ जून २०२२ पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम २९ मे २०२२ असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाला सांगितले.
सध्या हरभऱ्याचे बाजारभाव ४५००-४८०० रुपये प्रती क्विंटल आहे. गेल्या हंगामात हरभऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र २२.३१ लाख हेक्टर व एकूण उत्पादन २३.९७ लाख मे. टन इतके होते. सध्या सरासरी एकरी उत्पादन ११५८ क्विंटल प्रती हेक्टर असे आहे.

Check Also

राहुल गांधी यांची २४ एप्रिलला अमरावती व सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघात काँग्रेस नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *