Breaking News

अनिल परब म्हणाले, जे रिसॉर्ट माझे नाही त्यावरून ईडीच्या धाडी, न्यायालयात जाणार ईडीचे अधिकारी गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती

दापोली येथील कथित रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणांवर छापे मारी केली. जवळपास १२ तासाहून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याकडील सर्व कागदपत्रांची आणि चौकशी केली.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, दापोलीतील जे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची मालकी माझी नाही. त्याचे मालक सदानंद कदम आहेत. ते स्वतः यासंदर्भात पुढेही आले आहेत. न्यायालयातही ही माहिती सादर करण्यात आली आहे. तरीही ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे असल्याच्या कारणावरून ई़डीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सदानंद कदम यांच्यावर यापूर्वी आयकर खात्याने धाडी टाकल्या आहेत. त्याची चौकशी अद्याप सुरु आहे. तसेच याप्रकरणात यापूर्वीही मला नोटीसा देण्यात आल्या. मात्र त्या रिसॉर्टवर माझी मालकी नाही. आज दिवसभरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझी चौकशीही केली. त्यांना हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिलेली आहेत. तसेच त्यांनी काही कागदपत्रेही मागितली होती. ती कागदपत्रे त्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडी अधिकाऱ्यांना आज जसे चौकशीसाठी सहकार्य केले. तसे सहकार्य यापुढेही करणार असून चौकशांना सामोरे जाणार आहे. त्याचबरोबर मी कायद्याचा विद्यार्थी असल्याने न्यायालयात यासंदर्भात योग्य ती उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी केंद्राच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती तक्रार रिसॉर्टचे सांडपानी समुद्रात सोडले जाते म्हणून दाखल करण्यात आली आहे. मात्र ते रिसॉर्ट अद्याप सुरुच झालेले नाही. तसेच त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही पर्यावरण विभागाने माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. परंतु राज्याच्या प्रदुषण मंडळाने त्या रिसॉर्टला ना हरकत प्रमाणपत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र समुद्रात जाणाऱ्या सांडपाण्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला असताना आपल्या विरोधात मनी लॉंड्रीगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा काय संबध आहे असा सवाल करत याप्रश्नी आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडीने आज माझी चौकशी केली. त्यांना हवी असलेली कागदपत्रे काही जी माझ्याकडे होती. ती त्यांना दिलेली आहेत. मात्र कोणतीही गोष्ट त्यांनी जप्त केलेली नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *