माझे कुटुंब माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेचा कडक समाचार घेतला.
ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी सांगितले की, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भीती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही असेही ते म्हणाले.
गोरेगांव येथील नेस्को मैदानावर काल बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुख, विभागप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांची बावनकुळे कि एकशे बावन्नकुळे खाली आली तरी शिवसेनेला संपवू शकणार नाहीत असा उपरोधिक टोला भाजपाला लगावला होता. या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरील प्रत्युत्तर दिले.