Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, पण त्याचं अजून मंडळांना परवानग्या देणंच सुरूय शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं कोणीही बोलत नाही

मान्सूनचा कालावधी संपलेला असला तरी राज्यातून मान्सून पूर्णत: गेलेला नाही. त्यातच परतीचा पाऊसही राज्यातील अनेक भागात अद्यापही थैमान घालत आहे. त्यातच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळी सण निर्बंधमुक्त पध्दतीने साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यातील जनतेला १०० रूपयात शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा शिधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. या सर्वपार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी हजेरी लावलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो की ओला दुष्काळ जाहीर करावा. आत्ताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा सरकारकडून फक्त घोषणा होते. पुढे त्यावर काही झालं नाही. त्यासाठीच उध्दव ठाकरे स्वत: बांधावर जाणार आहेत आणि काही शेतकरी बांधवांचीही भेट घेणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याची माहिती दिली.

महत्त्वाच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाय करण्याची वेळ आल्याचं सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागातील नुकसान पावसामुळे वाढत आहे. तरीदेखील याच्याकडे कुणाचं लक्ष आहे का? तातडीने यावर मदत करणं आवश्यक आहे. यावर दीर्घकालीन पावलं उचलण्यावर अजून कुणीही चर्चा करत नाहीये. आता वेळ आली आहे की आपण यावर चर्चा करणं सुरू करायला हवं, असेही ते म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरेंनी बोलताना राज्यातील उद्योग बाहेर जात असल्यावरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना म्हणाले की, वेगवेगळ्या राज्यांमधून आपल्याकडे मुख्यमंत्री येत आहेत. त्यांच्या राज्यांमधली औद्योगिक धोरणं सांगतायत. अनेकदा आपल्याकडचे उद्योगही घेऊन जातात. पण हे होत असताना कुठेही आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेल्याचं दिसत नाहीये.
महाविकास आघाडीच्या काळात आम्ही दावोसला गेलो, तेव्हा ८० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली. त्यानंतर सरकार पाडलं गेलं. वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प राज्यातून निघून गेले. आता वेगवेगळ्या राज्यातून मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन सादरीकरण करत आहेत. पण अजूनही आपले दोनपैकी जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील, त्यांचं उत्सव मंडळं, १२-१ वाजेपर्यंत उत्सवाला परवानग्या हेच सगळं चालू आहे. कुठेही महिला, बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांसाठी ते बोलत नाहीयेत, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *