शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात आपलाच गट हा खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर या महिन्यातील तिसऱ्या सुनावणी वेळी ठाकरे गटाने शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी कशाच्या आधारावर झाला याविषयी सवाल केला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करताना ठाकरे गटाचीच प्रतिनिधी सभा आहे का, असा सवाल करत शिंदे गटाकडेही ९० प्रतिनिधी सभेतील सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला.
यावेळी पुढे बोलताना महेश जेठमलानी म्हणाले, कपिल सिब्बल यांनीच उध्दव ठाकरे यांच्याकडे संख्याबळ कमी असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. जर संख्याबळ कमी होते तर त्यांनी कशाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असा सवालही उपस्थित केला.
त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रतिनिधीसभेत एकूण १८० सदस्य आहेत. त्यापैकी ९० सदस्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे प्रतिनिधी सभेची बैठक घेण्याचा अधिकार फक्त उध्दव ठाकरे यांनाच कसा असू शकेल असा सवालही महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाला केला.
त्याचबरोबर शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असून निवडणूकीच्या एक दिवस आधी ठाकरे गटाने पक्षाच्या घटनेत दुरूस्ती केल्याचा आरोप केला.
महेश जेठमलानी यांच्यानंतर शिंदे गटाचे मनविंदर सिंग यांनी युक्तीवाद करत शिंदे गटाची बाजू मांडली.
दरम्यान, कपिल सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाचे देवदत्त कामत हे युक्तीवाद करत असताना महेश जेठमलानी यांनी कामत यांच्या काही मुद्यावर आक्षेप घेतला. त्यावर कामत आणि जेठमलानी यांच्यात चांगलीच वादावादी सुरु झाल्याने केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी यात मध्यस्थी करत दोघांमधील वाद थांबविण्याचा प्रयत्न केला.