राज्यात सत्तांतर होताच भाजपामध्येही आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून मागील काही काळापासून चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून नारळ देत भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविली आहे. तर दुसऱ्याबाजूला मुंबईच्या अध्यक्ष पदावरून मंगलप्रभात लोढा यांना हटवून त्यांच्या ठिकाणी आशिष शेलार यांच्याकडे धुरा सोपविली. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भविष्यकालीन योजना उघड केल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पक्षाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले जाईल. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गट यांचे मिळून २०० उमेदवार निवडून येतील. तसेच लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, असे सांगत भाजपाच्या भविष्यकालीन योजनेबद्दल माहिती दिली.
माझ्यावर ठेवण्यात आलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकणार तर विधानसभा निवडणुकीत आमचे २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बावनकुळे यांनी भाजपाच्या केंद्रीय तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच भाजपाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मला पुढच्या काळात सर्वांना सोबत घेऊन भाजपाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा पक्षाला उभे करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. मागील २९ वर्षात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात आली, ती मी पार पाडत आलो आहे. गावाच्या अध्यक्षापासून ते महाराष्ट्रच्या अध्यक्षपदापर्यंत माझा प्रवास राहिला असल्याचेही ते म्हणाले.