विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत राज्यातील पक्षनेतृत्व नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत दिल्लीतील श्रेष्ठींना पत्र पाठवून कल्पना दिल्याचे सांगितले. मात्र हा राजीनामा काँग्रेसने नामंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्याशी थोरात यांनी आपल्या नाराजीबाबत सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी आज १५ फेब्रवारी आपल्या नाराजीवर भाष्य करत म्हणाले, मी नाराज असल्याचे कोणी सांगितले प्रतिप्रश्न करत मला तर माध्यमातूनच समजत होते असे सांगत त्यावर अधिक बोलण्याचे टाळले.
दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींनी राज्यातील नेते आणि बाळासाहेब थोरात यांना पाचारण करत परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकरणानंतर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे एकत्रित रित्या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी या नाराजी नाट्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, अरे अरे अरे…मी नाराज होतो, हे कोणी सांगितले. मला माध्यमांकडूनच समजत आहे की मी नाराज होतो. मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही. पत्रव्यवहार हा प्रत्येक संघटनेत चालतो. तो मीदेखील केला, असे स्पष्ट केले.
१२ फेब्रुवारी रोजी बाळासाहेब थोरात आणि एच के पाटील यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर थोरात यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला, असे एक के पाटील यांनी सांगितले होते. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच नाही. मी बाळासाहेब थोरात यांना रायपूरमधील अधिवेशनास हजर राहण्याची विनंती केली आहे. आमच्यातील जे काही प्रश्न आहेत, त्यावर योग्य तो मार्ग काढला जाईल, असे एच के पाटील यांनी स्पष्ट केले होते.
याच बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला होता. प्रत्येक संघटनेत अनेक प्रश्न असतात. तसेच आमच्याही संघटनेत आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर अध्यक्ष मल्लिकार्जुव खर्गे याच्यासोबत बसून चर्चा करावी, असे मत एच के पाटील यांचे आहे. त्यामुळे चर्चा होईल. काही मुद्दे आहेत, त्यावर चर्चा होईल. हे सर्व प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत, असे ही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.