Breaking News

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला,… मग तुम्ही कशासाठी अदानीचे बुट चाटतय

मध्यंतरी सरकारची एक योजना सुरु झाली. शासन आपल्या दारी खरं तर हे सरकार अदानीच्या दारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ५० खोके एकदम ही ओके अशी घोषणा तुमची आहे. मी काही दिली नाही. त्या बोक्यांना आता खोके कमी पडले की काय धारावी आणि मुंबई गिळायला बसले अशी खोचक टोला राज्यातील शिंदे सरकारला लगावत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर भाजपावाले टीका करताना म्हणतात अदानी विरोधी बिल्डर लॉबीची बाजू घेत आहात, मग तुम्ही अदानीचे बुट कशासाठी चाटताय असा खोचक सवालही केला.

पुढे उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, धारावीचा पुनर्विकासाचे काम ज्याला दिलेय, त्याला प्रकल्प पूर्ण करायला १७ वर्षाची मुदत दिलीय. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण ज्या धारावीकरांची जागा आहे त्या धारावीकरांना लांब कुठे तरी जागा देणार असल्याचे हे खोके सरकार सांगतेय. इतकंच काय तर अदानीचा धारावी आराखडा महापालिकेकडे सादर करणार नाही. तसेच पर्यावरण विभाग असे, बांधकाम विभाग असेल आणि प्राधिकृत कोणी अधिकारी असेल त्याला अदानीचा प्रस्ताव मान्य करायला फक्त ८ दिवसांची मुदत दिलीय. तसेच अदानीच्या प्रस्तावाला त्या मुदतीत मान्यता दिली नाही तर त्या प्रस्तावाला आपोआप मान्यता दिल्याचे समजण्यात येण्याची तरतूद नव्या शासन निर्णयात केली आहे. ते दिल्लीत बसलेल्यांनी जणू काही शपथच घेतली आहे की, देशातील सर्वात श्रीमंत करण्याचा विडा उचलल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, या धारावीत टोलेजंग इमारती ते बांधणार आहेत. जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या १०० पिढ्या काहीही न करता बसून खाणार आणि तुम्ही तुमचा रोजगार बुडवणार असा आरोप करत तुम्हाला आता लक्षात आले असेल आपले सरकार पाडण्यासाठी कोणाकडून खोके या बोक्यांना पोहचले हे लक्षात घ्या असा आरोपही केला.
तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत बीडीडी चाळीचा पुर्नविकास होत आहे. तेथील चाळींच्या पुर्नविकासात ५०० चौरस फुटाची सदनिका देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याच धर्तीवर धारावीकरांना ही ५०० चौरस फुटाची सदनिका द्या अशी मागणी करत मुंबई महापालिकेने कोस्टल रोडचे काम सुरु केले. ते काम मुंबईकरांच्या पैशातून पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. सुरुवातीला त्या रस्त्याने जाताना एकही टोल लागणार नव्हता. आता मात्र त्या रस्त्याने जाताना टोल भरावा लागणार आहे.

याशिवाय धारावीच्या पुर्नविकासाचे काम सुरु होण्यापूर्वीच त्या जागेचा जो टीडीआर विक्री अदानीला सुरु करता येणार आहे. त्यामुळे मुंबईत कोणालाही नवी इमारत सुरु करायची असेल तर त्याला सर्वात आधी टीडीआर खरेदीसाठी अदानीच्या दुकानात जावे लागणार आहे. त्यामुळे त्याला काहीही न करता टीडीआरच्या स्वरूपात अब्जावधी रूपये मिळणार आणि तुम्ही कष्ट करत राहणार. प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर धारावील सर्व उद्योग पुन्हा गुजरातला नेले जातील जेणे करून धारावी विकासाच्या नावे इथल्या उद्योजकांची कामे काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, या धारावीत काय मिळत नाही, जागतिक दर्जाच्या चमड्याच्या वस्तू, रूग्णालयात लागणारी चांगले सामान इतकेच काय शस्त्रक्रियेसाठी लागणारा दोराही या धारावीतच मिळतो. त्यामुळे इथल्या जागेवर धारावीकरांसाठी जागतिक दर्जाचे सेंटर उभा करा अशी मागणीही केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा जेव्हा सर्वसामांन्यासाठी एखाद्या प्रकल्पाची घोषणा केली जाते. तेव्हा तेव्हा भाजपा मागच्या दाराने आर्थिक व्यवहार करायला पुढे येते. त्यातूनच आपले सरकार पाडल्याचा आरोप भाजपावर करत धारावी करांना ५०० चौरस फुटाची सदनिका द्या आणि त्यांच्या उद्योग इथेच ठेवा अशी मागणी करत पुर्नविकास प्रकल्पाचे काम सुरु करण्याआधी धारावी करांना त्यांचे घर आणि सुक्ष्म लघु उद्योगासाठी पर्यायी जागा दिल्याशिवाय धारावीच्या पुर्नविकासाची एकही वीट रचू देणार नाही इशारा देत हा इशारा मोर्चा आहे असा गर्भित इशाराही दिला.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *