Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; रेल्वे बंद झाली तर बसेस रस्त्यावर आणा महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षातून घेतला परिस्थितीचा आढावा

मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले २४ तासात सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रेल्वेची २५ अशी ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महानगरपालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी तसेच त्यांच्यासाठी अल्पोपहाराची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिक पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबई शहर, उपनगरात नियंत्रण कक्षातून सुरू असलेली कार्यवाहीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली. मुंबई शहर, उपनगरात पावसामुळे झाडे अथवा फांद्या पडल्याच्या घटना, सरासरी पडलेला पाऊस, पाण्याचा निचरा संथगतीने होणारी ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, रोजचे अहवाल अद्यावत करण्याबाबतची माहिती देण्यात आली.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी.वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे, उपायुक्त यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *