Breaking News

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या पाठिंब्यावरून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली. या टीकेला राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला उपरोधिक टोला लगावला.

आज १३ एप्रिल रोजी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बोलत होते.

राज ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, २०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. केवळ माझ्या पक्षाचे ४० आमदार फोडले म्हणून ती टीका नव्हती असा उपरोधिक टोला शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावत गेल्या ५ वर्षात ज्या चांगल्या गोष्टी मोदींच्या सरकारने केल्या, त्याचं कौतुक देखील मी केलं असेही यावेळी स्पष्ट केलं.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, अयोध्येत राम मंदिर उभारल्यावर त्याचं कौतुक पण मीच केलं होतं. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभं नाही करायचं आहे, परंतु १९९२ पासून २०२४ पर्यंत राम मंदिर रखडलं होतं, जे २०२४ ला उभं राहिलं ह्याचा निश्चित मला आनंद आहे आणि ह्याचं कौतुक पण मी केलं असेही यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले की, १९९२ च्या आंदोलनाच्या वेळेला टीव्हीवर कारसेवकांना घातलेल्या गोळ्या, कारसेवकांची शरयू नदीत वाहणारी प्रेतं ही दृश्य लोकांनी पाहिली होती. ती दृश्य खूप चीड आणणारी होती. ह्या राम मंदिरासाठी कार सेवकांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. त्यामुळे इतक्या त्यागानंतर मंदिर उभं राहिलं त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की जरी राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी जर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते हे राम मंदिर उभंच राहिलं नसतं, असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, एनआरसीचा विषय असेल, ३७० कलमाचा विषय असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, तर हे विषय प्रलंबितच राहिले असते. त्यामुळे मी अनेक वेळा मोदींना फोन करून त्यांचं चांगल्या कामांसाठी व्यक्तिशः अभिनंदन देखील केलं आहे. त्यामुळे अजून काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर एका बाजूला कडबोळं नेतृत्व आणि दुसरीकडे एक सक्षम नेतृत्व असा पर्याय असताना नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाला अजून एक संधी मिळायला हवी असं मला वाटलं आणि त्यातून नरेंद्र मोदींना पाठींबा द्यायचा निर्णय आमच्या पक्षाने घेतल्याचेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रासाठी आमच्या नरेंद्र मोदींकडे काही मागण्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन करणं आणि तसंच मी सभेत म्हणलं तसं की तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि सर्व राज्यांना एकसमान वागणूक मिळायला हवी, अशा काही मागण्या असल्याचे यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आमच्या पक्षातील कोणाशी प्रचारासंबंधी संपर्क करायचा आहे ह्याची यादी लवकरच पक्षाकडून संबंधितांना कळवली जाईल, त्यांनी त्यांच्याशीच संपर्क करावा, आणि माझ्या सहकाऱ्यांना, ह्या उमेदवारांनी मानानेच वागवलं पाहिजे असेही यावेळी सांगितले.

प्रचारासाठी सभा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या ह्याचा निर्णय चर्चेअंती घेतला जाईल. मी जो पाठींब्याचा निर्णय घेतला आहे, तो पक्षाचा विचार करून घेतला आहे, ज्यांना तो समजतच नसेल त्यांनी त्यांना वाटेल तो निर्णय घ्यावा असे सूचक वक्तव्य केले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुण्याचे माजी मनसैनिक वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने लोकसभेला उमेदवारी दिली आहे. वसंत मोरे यांना पाठिंबा देणार का असा सवालही यावेळी केला. मात्र राज ठाकरे यांनी थेट उत्तर देण्याचे बोलण्याचे टाळले.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *