Breaking News

वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण, माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या…

मुंबईत काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत असल्यानेच काँग्रेस आघाडीने याआधी सहाही मतदारसंघात विजय मिळावलेला होता आणि त्यात काँग्रेसच्या पाच व राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा होती. यावेळी महाविकास आघाडी म्हणून जागा वाटपात मुंबई काँग्रेसने तीन मतदारसंघाची मागणी केली होती. पण दोनच मतदारसंघ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे. विषेशतः मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे. परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे. मोदींच्या हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच मविआचे लक्ष्य असून पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करु, असे मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मी नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या त्यात काहीही तथ्य नाही. जिथे पक्षाची ताकत आहे ती जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजे असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असते आणि त्यात काहीही चुकीचे नाही. काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही आहे व मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्या पक्षश्रेष्ठी समोर आपले मत मांडत असतो. मुंबई काँग्रेसची अध्यक्षा म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीसमोर मांडल्या, तो माझ्या कर्तव्याचा भागच आहे. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ती आहे, काँग्रेसचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता पक्षाचा शिष्टाचार मानतो. पक्षाने एकदा भूमिका घेतली की पक्षाचे काम करणे ही माझी आणि माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे आणि येणाऱ्या काळात मुंबई काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला दिसेल. पक्षाची शिस्त आणि विचारधारा हे आमच्यासाठी महत्वाची आहे.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, यावेळच्या लोकसभा निवडणुका ह्या देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. देशाचे भवितव्य, आपल्या देशाची लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आहे. मागील १० वर्षांच्या अन्याय काळात समाजातील प्रत्येक घटकावर मोदी सरकारने अन्याय केला आहे. या सरकारने फक्त आपल्या मित्रांचे खिसे भरण्याचा काम केले, धर्म-जाती-प्रांत-भाषेच्या नावावर समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप केले आहे. गोरगरिब, दलित, आदिवासी, मागास वर्गासाठी, महिला व तरुणांसाठी काहीही केलेले नाही उलट दलित व महिलांवरील अत्याचार आणि अन्याय मोदी सरकारच्या काळात वाढला आहे. देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला वातावरण अनुकुल आहे. राज्यातही काँग्रेस पक्षावरचा जनतेचा विश्वास आणखी दृढ झालेला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेने देशातील व राज्यातील वातावरण बदलले आहे. भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईतील इंडिया आघाडीची छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील समारोपाची सभा प्रचंड यशस्वी झाली.

तसेच धारावीतही भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. मोदींची हुकूमशाही मोडून जनतेचे, न्यायाचे राज्य स्थापन करणे हाच आमचा उद्देश आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *