मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांचा प्रवास खर्चाबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात अडकून पडलेल्या सर्व स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उचलणार आहे. यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाईन सुरु करून मजूरांची माहिती घेतली जाणार आहे व जिल्हाधिकारी व रेल्वे अधिका-यांना पत्र लिहून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
मोदी सरकारने अचानक कुठलेही नियोजन आणि पूर्वतयारी न करता लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरित मजूर विविध राज्यात अडकून पडले आहेत. राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाने त्यांना अन्नधान्याचे वाटप करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. पण एक महिन्यापासून अधिक काळापासून काम नसल्याने त्यांच्याकडे पैसे नाहीत. विविध राज्यातील असे लाखो मजूर उपाशीपोटी शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या गावी जात आहेत. काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी लावून धरल्यामुळे केंद्र सरकारने या मजूरांसाठी रेल्वेची सोय केली आहे, मात्र तिकिटाचे पैसे या गरीब मजूरांकडून वसूल करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने या लाखो मजूरांना वा-यावर सोडले. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या मजूरांचा प्रवास खर्च काँग्रेस पक्ष करेल अशी घोषणा केली. या घोषणेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेस मंत्र्यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत स्थलांतरित मजूरांच्या प्रवासाचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरित मजूरांसाठी एक हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून त्याद्वारे मजूरांची माहिती घेतली जाईल. त्यांच्या मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags amit deshmukh ashok chavan aslam shaikh balasaheb thorat congress covid-19 migrant labour traval expenditure vijay wadettiwar vishvajeet kadam
Check Also
नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली
जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …