Breaking News

मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई: प्रतिनिधी

मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी १०७%..कधी १०४%… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”..पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा…नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

मुंबईत सुमारे २५२.७४ किमी लांबीचे एकुण १७० मोठे नाले तर ४३८.९ कि.मी लांबीचे छोटे नाले, पेटीका नलिका ६२१.४६ किमी., रस्त्याच्या बाजूची उघडी गटारे १९९१.६९ किमी. जाळया संख्या १,९०,४८८ भूमिगत कमानी /नलिका पर्जन्य जलवाहिन्या ५६५.४१ किमी असून यांच्या साफसफाई साठी दरवर्षी सुमारे १५० कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो. दरवर्षी नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात. पण किती गाळ काढला त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला त्याचे सीसीटीव्ही फुटेज असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

आम्ही गेली अनेक वर्षे नालेसफाईच्या कामातील फोलपणा प्रत्यक्ष जागेवर जाऊन उघड करतो आहोत. पण कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतो. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची अभद्र युती महापालिकेत असून त्यांनी गेल्या पाच वर्षात नालेसफाईच्या नावावर सुमारे १ हजार कोटींचा घोटाळा करुन तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी महापालिकेने १०७% तर कालच १०४% नालेसफाई झाली असा दावा केला होता आणि आज सकाळी पडलेल्या पावसाने हे सगळे दावे वाहून नेल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान दोनच दिवसापूर्वी आमदार अॅड आशिष शेलार यांनी गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत नालेसफाईचा दौरा करुन न झालेल्या कामांचा पर्दाफाश केला होता. आज पावसाने ते अधिकच उघडे केले आहे.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *