Breaking News

ग्रामीण भागातील सुमित रामटेकेने मिळविले UPSC परिक्षेत यश ३५६ वी रँक मिळवित उत्तीर्ण

नव तरूणांनामध्ये आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलांना मोठे होण्याची आस असते. त्यासाठी ते अपार कष्टही घेत असतात. कधी आर्थिक अडचणीवर तर कधी इतर असलेल्या संकटावर मात करत जिद्दीने आपले ध्येय गाठताना काहीजणच यशस्वी होताना दिसून येतात. या काही जणांमध्ये वणी तालुक्यातील शिरपूर या गावातील सुमित सुधाकर रामटेके यांनी युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिऴविले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात UPSC चा सोमवारी ३० मे रोजी जाहीर झालेल्या निकालात वणी तालुक्यातील शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने ३५६ वी रँक मिळविली. विशेष म्हणजे त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. त्याच्या या प्रयत्नाने वणीसारख्या ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली आहे.

घरची परिस्थिती हालाखीची असतानाही सुमितने यशोशिखरावर पोहचण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. सुमितचे वडील शिरपूर येथील गुरुदेव विद्यालयात परिचारक होते. सुमितने शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. पुढील शिक्षण वणी येथील जनता विद्यालात पूर्ण केले. बारावीनंतर आयआयआयटी वाराणसी येथून बी.टेक केले. त्याला उत्तम वेतनाची नोकरीसुद्धा मिळाली होती. मात्र, प्रशासकीय सेवेत जायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

शिरपूर सारख्या लहानशा गावातून येऊनही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिसऱ्या प्रयत्नात त्याने आयपीएस रँक मिळवली. सुमितने यापूर्वी दोन वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. दुसऱ्यांदा त्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातून ७४८ वी रँक प्राप्त केली होती. दिल्लीत ‘डायरेक्टर इन इंडियन कॉर्पोरेट लॉ’ येथे तो रुजू झाला होता. मात्र, त्याने पुन्हा जोमाने परीक्षेची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस होत यश प्राप्त केले.

हा प्रवास स्वप्नवत असला तरी सुमितच्या यशामागे कुटुंबियांचे प्रोत्साहन, त्याची स्वतःची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमच कारणीभूत असल्याची भावना निकालानंतर रामटेके परिवाराने व्यक्त केली. सुमितच्या यशात आई ज्योत्स्ना व वडील सुधाकर रामटेके यांचे योगदान महत्वाचे ठरले. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘सुमित’ आदर्श ठरला आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *