एकाबाजूला काँग्रेसला मजबूत करण्याच्यादृष्टीने नुकत्याच झालेल्या राजस्थानातील उदयपुर येथील नवसंकल्प शिबिरात चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना मजबूत कऱण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. मात्र मागील अनेक वर्षआपासून पर राज्यातील उमेदवार महाराष्ट्रातून संसदेत पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही सुरु ठेवत आपल्याच ठरावाला हरताळ फासला असल्याचे दिसत असताना यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे अशा शब्दांत टीकाकारांना उत्तर दिले.
इम्रान प्रतापगढी यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून यावेळी नाना पटोले तसेच इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेसचं चूक नसेल तरी चूक दाखवण्याची परंपरा सध्या सुरु आहे. केंद्रातील कमकुवत सरकारने आठ वर्षात देशाची वाट लावली असून त्या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी काँग्रेसच्या निर्णयावर कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे त्यातील ही एक मानसिकता आहे.
आमचे काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी मराठीत शपथ घेतली आहे. त्यामुळे देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिल्याचे त्यांनी सांगत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानले.
निवडणुकीला काही जास्त दिवस राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दिवसाही स्वप्नं पाहणारे विरोधक आम्ही पाहिले आहेत. प्रत्येक १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडा फडकवण्याचं त्यांचं स्वप्न या राज्याच्या जनतेला माहिती आहे. या निवडणुकीत मतदान उघडपणे होते. त्यामुळे ते दावा करत असलेली मॅजिक फिगर एकदा लोकांसमोर येऊ दे असे आव्हानही त्यांनी यावेळी विरोधकांना दिले.
राज्यसभेच्या निवडणुका विनविरोध होतात, पण विरोधकांचा काही दावा असेल तर त्यावर काही बोलायचं नाही असेही त्यांनी सांगितले.
नगमा आणि पवन खेरा यांनी आपली १८ वर्षांची तपस्या कमी पडल्याचं सांगत नाराजी जाहीर केल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, मी श्रेष्ठ आहे असं मत मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे, ते त्यांनी मांडलं असेल. व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचे सांगत भाजपात उमेदवारी दिलेले आहेत आणि तिथेही कुरघोडी आहे. पण तिथे लोकशाही नाही, मत मांडण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे मांडलं असेल कारण त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. हा पक्षीय स्तरावरील प्रश्न नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. हे सरकार झालं, त्याचं कारण सर्वांना माहिती आहे. सोनिया गांधींनी तेव्हा किमान समान कार्यक्रमाची भूमिका मांडली होती. त्याचा आढावा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. भूमिका पूर्ण झाली का हे तपासणार आहे. सरकारने त्याप्रमाणे काम करावं अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.