मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीवरून आधीच विरोधकांकडून टीका करत असताना आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून नाराजी व्यक्त करत नियमित अधिवेशन घेण्याच्या अनुषगाने सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून एकत्रित नियमावली तयार करावी असे आदेश दिले. अधिवेशनाच्या कालावधीवरून अध्यक्षांनीच आता स्पष्ट नाराजी व्यक्त केल्याने महाविकास आघाडीच्या एकूणच धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
विधानसभेचे कामकाज सुरु होताच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने सभागृहात करण्यात आलेल्या नियोजनाचा उपरोधिकपणे स्तुती करत कौतुक केले. त्यावर विधानसभाध्यक्षांनी वरील आदेश दिले.
सभागृहात आले की, कोरोनाला रोखण्याचे सर्व प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे जाणवते. त्यासाठी सरकारने केलेले नियोजन योग्य असल्याचे जाणवते. मात्र बाहेर या गोष्टी जाणवत नसल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.
त्यावर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने आमदारांना आपले अधिकार राखता येत नाहीत. तसेच जनतेचे प्रश्नांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि विरोधकांनी एकत्रित बसून नियमित अधिवेशन कसे घेता येईल यादृष्टीने नियमावली तयार करावी असे निर्देश देत आगामी अधिवेशन हे नियमित स्वरूपाचे झाले पाहिजे असे स्पष्ट आदेशही त्यांनी दिले.
दरम्यान, सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रश्नांचे बॅनर असलेला शर्ट घालून सभागृहात आले होते. यावरून सत्ताधारी, विरोधक यांच्याकडून गोंधळास सुरुवात झाली. त्यावर अखेर विधानसभाध्यक्ष पटोले यांनी राणा यांना बाहेर जावून सदरचे बॅनर काढून येण्यास सांगितले. त्याचबरोबर असे कोणी बॅनर घालून येत असेल तर त्यास प्रवेशद्वारावरच रोखण्याचे आदेश मार्शलला दिले.