मराठी ई-बातम्या टीम
मागील काही दिवसांपासून भाजपाविरोधात ठाम भूमिका घेणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आज अखेर मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत जवळपास एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “महाराष्ट्र से निकला हुआ मोर्चा हमेशा कामयाब होता है”, असे सांगत त्या मोर्चाची सुरुवात आज येथून सुरु केल्याचे जाहीर करत महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरु केलेली आघाडी असेल किंवा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काम असेल या दोघांबाबत देशात कोणालाही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर वर्षा बंगल्याच्या प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आले आहेत. या ७५ व्या वर्षात ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या. त्या होताना दिसत नाहीत. त्यामुळे देशात परिवर्तन होण्याची गरज असून या परिवर्तनासाठी देशभरातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहे. वास्तविक पाहता तेलंगणा आणि महाराष्ट्र हे दोघेही भाऊच असून आम्हा दोन्ही राज्यांना एक हजार किलोमीटर लांबीची एकच सीमा असल्याचे आवर्जून सांगत आजची भेट दोन राज्यांमधी सौहार्दाच्या वातावरणाबरोबरच आगामी देशातील राजकिय वातावरणाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हा दोघांमध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली आहे. तसेच इतर गोष्टींवरील चर्चेला सुरुवात झाली असून आणखीही आमच्यात चर्चा होणार आहे. तसेच भविष्यकाळात आमची एकत्रितरित्या काम करण्याबाबत एकमत झाले असून आम्ही एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगत देशाला सशक्य बनविण्यासाठी आम्ही एकत्रित येत आहोत. यासंदर्भात पुढील चर्चा हैद्राबाद किंवा इतर ठिकाणी आम्ही करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना हैद्राबादला येण्याचे निमंत्रण दिले.
केंद्र सरकार कडून केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पध्दतीने वापर करण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्या नीतीमध्ये बदल करावे असे आवाहन करत अन्यथा आम्ही त्यांना घरी बसवू असा इशारा देत बिगर रालोआ पक्षांच्या नेत्यांना एकत्रित येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.