मराठी ई-बातम्या टीम
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केल्यानंतर आज ते मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यापार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी या भेटीसाठी सोनिया गांधी यांची परवानगी घेतली का? असा खोचक सवाल केला. त्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी संतापून कोण ते? मी ओळखत नाही अशी खोचक विचारणा करत २०२४ नंतर देशात असे चु## दिसणार नाहीत असा खोचक शब्दात पलटवार केला.
देशाच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, स्टॅलिन किंवा मग उध्दव ठाकरे असो….बिगरभाजपा सरकारे असणारी राज्ये एकत्रित बसून देशातील आगामी राजकारणाबाबत विचार करत आहेत. शरद पवार सर्वात मोठे नेते असून आमचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी या भेटीवरुन टोला लगावला असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेण्याआधी सोनिया गांधींची परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली आहे. यावर उत्तर देताना संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर करत कोण आहेत किरीट सोमय्या? देशात असे चु्## फार आहेत. देशातील अशा प्रत्येक चु## वर, शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणे मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु्## लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशात राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असेल. १० मार्चनंतर तुम्हाला कळेल असेही ते म्हणाले.
एक मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना भेटायला येत असताना अशाप्रकारे भाजपाच्या लोकांनी अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, मराठी लोकांचा अपमान आहे. म्हणूनच मी त्यांना चु## म्हटलं आहे. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देते हा देखील अपमान असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. राव यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी कारवाईच्या पुराव्याची मागणी राव यांनी अलीकडेच केली. तसेच भाजपाच्या दडपशाहीविरोधात बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनीही राव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे.