मराठी ई-बातम्या टीम
देशात सध्या सुडाचे राजकारण सुरु असून हे असले सूडाचे राजकारणाचे हिंदूत्व आमचे नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा तेलंगणा राष्ट्रसमितीचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भाजपाला टोला लगावत हे असेच सुरु राहीले तर देशाचे भवितव्य का? असा सवाल त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला पराभूत करण्याच्या अनुषंगाने सध्या बिगर भाजपा पक्षांची आणि मुख्यमंत्री एकत्रित येत आहे. याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा या शासकिय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशातील सध्या वातावरण फारच गढूळ झाले आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांना हात लावण्याऐवजी न केलेल्या गोष्टींवरून विरोधकांना जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे देशातील विकास कामांनाबाबत बोलले जात नाही. राज्यां राज्यांमध्ये संघर्ष निर्माण होईल असे पाहिले जात आहे. यापार्श्वभूमीवर आजची भेट ही फक्त सदिच्छा भेट होती असे मी म्हणणार नाही. परंतु आम्ही राज्या राज्यांमध्ये चांगले वातावरण रहावे यादृष्टीकोनातून या भेटीकडे पहात असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या दोघांमध्ये काही गोष्टींवर चर्चा झाली आहे. तर काही गोष्टींवर एकमतही झाले आहे. आमच्यात चर्चा झाली म्हणजे लगेच त्या गोष्टींना आकार आणि मुर्त स्वरूप येणार नाही. त्यासाठी काही काळ जावावा लागणार आहे. तसेच आणखी काही चर्चा व्हावी लागणार आहे. आणि आमच्यातील चर्चा जसजशी पुढे सरकेल त्याची माहिती आम्ही आपणा सर्वांसमोर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परंतु देशात परिवर्तन होणे गरजेचे असून या परिवर्तनासाठी एकत्रित काम करण्याबाबत आमचे एकमत झाल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगत बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांना आणि इतर नेत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या भवितव्याच्या अनुषंगाने आमच्यात आता चर्चा सुरु झाली आहे. त्यात आणखी सविस्तर होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्ष्ट केले.