मराठी ई-बातम्या टीम
देशातील लोकसभा निवडणूकीला आणखी दोन वर्षाचा कालवधी असला तरी केंद्रातील मोदी सरकारला पर्याय निर्माण करण्यासाठी बिगर रालोआ पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अशा नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ही बैठक बारामती येथे होवू शकेल अशी माहिती तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील टीआरएस पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ही भेट शरद पवार यांच्या सिव्हर ओक या निवासस्थानी झाली.
देशातील प्रमुख समस्येच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली असून या समस्या सोडविण्यासाठी काय करता येवू शकेल याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली आहे. तसेच विकासाच्या मुद्यावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय काय गोष्टी करता येईल या अनुषंगाने राष्ट्रीय नेते असलेले शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. तसेच देशाच्या समोर जाताना नवा अजेंडा घेवून जनतेसमोर जावे लागणार आहे. त्याअनुषंगानेही याबैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संवाद साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, आजची बैठक ही महत्वाची असून ही बैठक महत्वाची असण्यामागे देशातील बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते भुकबळी आदीसह इतर महत्वाचे प्रश्न आज देशासमोर आ वासून उभे राहीले आहेत. देशाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तेलंगणाने जी महत्वपूर्ण योजना दिली त्याचा देशाने स्विकार केला आहे. त्यामुळे देशात विकास करण्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल याबाबत यावेळी चर्चा झाली.
या चर्चेत आणखी काहीजण जोडले जाणार आहेत. त्यामुळे त्या सर्वांशी चर्चा झाल्यानंतर या नव्या अंजेड्यासाठी बैठक होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री के.सी राव जिथे सांगतील तिथे होईल. तसेच जर त्यांनी सांगितले की सदरची बैठक बारामतीत व्हावी तर ती बारामतीत होईल. त्या चर्चेनंतर नव्या अजेंड्यासह आम्ही जनतेसमोर येवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
It was a pleasure meeting with Shri K Chandrashekhar Rao, CM Telangana at my Mumbai residence today.
We discussed various issues of development and cooperation between Telangana and Maharashtra.@TelanganaCMO pic.twitter.com/l2B7BmwXKP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 20, 2022