मराठी ई-बातम्या टीम
शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारवजा करत म्हणाले की, आवरा आता संजय राऊताना अशी विनंती केली. तर कोणी कोणालाही भेटू द्या २०२४ ला पुन्हा मोदीच ४०० पार जागेंसह केंद्रात येणार असा दावाही त्यांनी यावेळी केला.
एखाद्या माणसाला आपल्या पायाखालची वाळू घसरली की, आपण आजपर्यंत जे केलं ते उघड पडलेलं आहे आणि कारवाई होईल. तसेच आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबातील लोकांवर देखील होईल अशी भीती वाटल्यानंतर माणूस सैरभैर होतो. वास्तविक ग्रामीण मराठीत यापेक्षा वाईट शब्द आहे. पण मी तो न वापरता सैरभैर हा शब्द वापरत असल्याचे सांगत अशीच स्थिती आत्ता संजय राऊत यांची झाली असून त्यामुळे ते रोज उठून महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजवणारी विधान करत आहेत आणि शिवराळ भाषा वापरत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मी मागील दोन दिवसापासुन उद्धवजीना विनंती करीत आहे की, त्यांना जरा आवरा, संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं दिसतेय. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा बिघडवित आहेत. मला मागील २७ महिन्यांमध्ये शिवसेनेचे एकही प्रवक्ते बोलताना दिसत नाहीत. अनिल देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणीच बोलत नाही. एकमेव प्रवक्ते त्यांना एकच काम मोदींना शिव्या, केंद्राला शिव्या, राज्यपालांना शिव्या हे एकच काम प्रवक्ते म्हणून करताना दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना शिवी दिली होती. त्याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कडक शब्दात बोलायचे, पण ते शिवीगाळ करत नव्हते. परवा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी एक शिवी वापरली असे म्हणताच तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी आज राऊतांनी ### शब्द वापरला आहे, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांना करून दिली.
संजय राऊत ### हा शब्द अनेक वेळा वापरतात. त्यामुळे मला एक वाटते की जोपर्यंत उद्धवजींना राज्य चालवयाचे आहे, जोपर्यंत त्यांच्याकडे राज्य आहे. तोपर्यंत त्यांनी राज्य चालविताना बिघडत चाललेल्या या संस्कृतीचा विचार केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “२०१९ ला असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. मतमोजणीच्या वेळी सर्वजण नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. परंतु त्यांचं मग काय झालं, ते देशाने पाहिले आहे. आता २०२४ मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावाही केला.