राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करण्यात आले. मात्र खाते वाटपानंतर आधीच्या तुलनेच चांगली खाती मिळाली नसल्यावरून शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीच्या चर्चा बाहेर आल्यानंतर या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील माणसे त्यांच्या दिमतीला देत आपल्याच मंत्र्यांवर अप्रत्यक्ष लक्ष ठेवणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शिदें गटातील अनेक मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. त्यात शंभुराज देसाई, दादाजी भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. या मंत्र्यांकडे त्यांची विश्वासू माणसे आहेत. मात्र या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच मंत्री झालेले संजय राठोड, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांचा समावेश आहे. मात्र यातील पाच मंत्र्यांकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना या मंत्र्यांकडे पाठविले आहे. त्यासाठी या मंत्र्यांना व्यक्तीश: शिंदे यांनी फओन करून त्या अधिकाऱ्यांना तुमच्याकडे रूजू करू घ्या असे फर्मान काढले आहे. त्यामुळे या पाच मंत्र्यांनी शिंदे यांनी पाठविलेल्या अधिकाऱ्यांना स्वत:कडील सेवेत सामावून घेतले असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
२०१४ साली फडणवीस सरकारच्या काळात भाजपा मंत्र्यांच्या प्रत्येक विभागात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसाठी खास जागा निर्माण करून देण्यात आल्या होत्या. या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक विभागाची माहिती, धोरण आणि काही महत्वाच्या फाईलींची वर्गवारी करण्यात येत होती. तसेच या अधिकाऱ्यांकडेच काही विशिष्ट फाईली जात होत्या याची चर्चा आजही मंत्रालयातील अनेक विभागांकध्ये चर्चिली जाते. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनीही आपल्या मंत्र्यांकडे याच पध्दतीने स्वत:कडी विश्वासू कर्मचारी वर्ग या मंत्र्यांकडे रूजू करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे अधिकारी पाठविण्यामागे या ९ मंत्र्यांकडून करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती तसेच अंतर्गत होत असलेल्या काही गोष्टींची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांना आपसूकच मिळणार आहे. तसेच सूरत-गुवाहाटीची पुर्नरावृत्ती होत असेल तर ती वेळीच रोखण्यास मदत व्हावी म्हणून शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील अधिकारी आपल्या मंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याचेही मंत्रालयात बोलले जात आहे.