मुंबईः विशेष प्रतिनिधी
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांच्या जवळपास सर्वच संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी, कातकरी आणि शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मात्र या मोर्चाचे सारे श्रेय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे फारसे कार्यकर्त्ये न आणता श्रेय लाटल्याचे चित्र आजच्या सर्वच घटनांवरून दिसून येत असल्याची चर्चा दस्तुरखुद्द डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली.
या कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचेही आंदोलन करण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी घेतला. त्यासाठी स्वतःच्या सर्व संघटनांना एकत्रित करत जवळपास २१ हजार कष्टकरी, शेतकरी, शेतमजूरांना एकत्रित करत नाशिक ते मुंबई असा पायी आणि वाहन मोर्चा काढला. या मोर्चात डाव्या पक्ष आणि संघटनांवर विश्वास ठेवत कष्टकऱ्यांनी पायी येत मुंबईत पोहोचले. मात्र मोर्चा मुंबईत पोहोचल्यानंतर हा मोर्चा संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. तसेच पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राजकिय कौशल्यपूर्ण भाषणाने डाव्यांचा संपूर्ण मोर्चाच आपल्या खिशात टाकल्याची प्रतिक्रिया डाव्या चळवळीतील एका धडाडीच्या कार्यकर्त्याने दिली.
याचबरोबर या मोर्चामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही ठराविक कार्यकर्त्येच सहभागी झाले. ते ही स्वतःच्या पक्षाचे नेते कधी मोर्चाच्या ठिकाणी हजेरी लावतात त्या वेळेनुसार आत बाहेर करत होते. तसेच मोर्चा राजभवनाकडे निघाला तेव्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मंडळीच सर्वात पुढे निघाले होते. डाव्यांचे नेते तर गर्दीत कुठे हरविले याचा शोध घ्यावा लागत होता असेही दुसऱ्या एका मोर्चेकऱ्याने सांगितले.
त्यामुळे डाव्यांच्या शेतकरी मोर्चाला काँग्रेस-राष्ट्रवादीने खिशात टाकल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात असलेल्या संतापाला या माध्यमातून व्यक्त करत सबंध मोर्चाचा रोखच राज्यपाल विरोधी करून टाकल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी कडूनही असा मोठा मोर्चा काढता आला असता परंतु त्यांनी तो जाणीवपूर्वक टाळत डाव्यांच्या मंचाचा वापर करून घेतल्याची चर्चाही डाव्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली.