कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माझे आणि आमच्या सहकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.
संसदेचे सध्या शेवटचे हिवाळी अधिवेशन सुरू असून मागील तीन चार दिवसांपासून ११ डिसेंबर रोजी घडलेल्या सुरक्षा भंग प्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावे अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी बाकावरील सदस्यांनी चर्चेची मागणी केली म्हणून सध्या केंद्र सरकारकडून निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. सध्या या सुरु असलेल्या गोंधळातच खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कांदा उत्पादनावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली. मात्र त्या मागणीवर कोणतीही चर्चा न करता थेट लोकसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केल्याचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आपल्या एक्स ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून निलंबना मागील कारण सांगितले.
"शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका" अशी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या प्रशासनाला ताकीद होती.
छत्रपतींच्या नावाने मतं घेऊन सत्तेत आलेले हुकूमशहा मात्र शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवालाच हात घालायला निघालेत. "कांद्यावरील निर्यातबंदी उठवा"… pic.twitter.com/mVQBF8WBs1
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2023
या व्हिडिओमध्ये डॉ अमोल कोल्हे म्हणाले, आणीबाणीबद्दल आजपर्यंत केवळ ऐकून होतो, आज या निलंबनाच्या निमित्ताने अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली. सरकारला केवळ “मन की बात” करायची आहे, “जन की बात” ऐकायचीच नाही हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे अशी टीकाही केली.
कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अवकाळी आणि दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी आम्ही संसदेत करीत होतो. परंतु आमचं म्हणणं ऐकून न घेता, अशी कोणतीही चर्चा न करता आमच्या… pic.twitter.com/CsNUO5QCPO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 19, 2023
सरकारची हीच भूमिका असेल तर आम्हालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल. रणांगणातील युद्धात आमचा इतिहास सर्वश्रुत आहे, याची नोंद सरकारने घ्यावी ! असा इशाराही केंद्रातील भाजपाला डॉ अमोल कोल्हे दिला.