मराठी ई-बातम्या टीम
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सतत करण्यात येत असलेल्या आरोपावर पलटवार म्हणून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सोमय्या यांच्या कथित घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केला. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवित तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत वेळ आली की मी ते सगळं बाहेर काढेन असा इशारा आज भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत बॉय का? असा प्रश्न विचारत स्वत:च्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? अशी आठवण करून देत वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी ? अशी खोचक विचारणाही केली.
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
मिलिंद नार्वेकरांच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही तितक्याच खोचकपणे प्रत्युत्तर देत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय? अशा किती घटना मी आपणास सांगू? असा खोचक इशारा देत मला बोलायला लावू नका असा गर्भित इशाराही दिला.
सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.@NarvekarMilind_
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) February 16, 2022
त्यामुळे एकाबाजूला जनतेसमोर नारायण राणे विरूध्द ठाकरे घराणे असे चित्र जरी दिसून येत असले तरी किंवा तसा दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अप्रत्यक्षरित्या चांगलेच संपर्कात आणि एकमेकांच्या मदतीसाठी या दोघांच्याही ट्विटवरून दिसून येत आहे.
बाकी सुजाण नागरीक हे दोन्ही ट्विट पाहल्यानंतर काय समजायचे ते समजून घेतीलच.