मुंबई : प्रतिनिधी
पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून “टोल” गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना? तिघाडीच्या भांडणात अडकली तर नाही ना? मुंबई- पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करुन “लक्ष्मीदर्शन” तर करीत नाही ना? फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय? , अशी टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रेडी रेकनरचे दर अद्याप जाहीर झालेले नाहीत. वास्तविक दरवर्षी मार्च महिन्यात नवे दर शासन जाहीर करते. या दरावर घरांच्या किंमती, पुनर्विकासाचे प्रकल्पांचे भवितव्य ठरत असते. विशेषत: घरांच्या किंमती रेडी रेकनरच्या दरावर ठरत असल्याने हे दर जाहीर होणे आवश्यक असते. यावर्षी शासनाने कोरोना मुळे मे महिन्या पर्यंत मुदतवाढ दिली पण त्यानंतर अद्याप आँगस्ट पर्यंत दर जाहीर झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
या बाबत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, निधीसाठी रोज केंद्र सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कमी करीत, मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. चला चांगले आहे! पण…रेडी रेकनरच्या दरांचे काय? ते का घोषित करत नाही? रेडी रेकनरचे दर मार्च मध्ये कोरोनामुळे जाहीर झाले नाहीत… मे पर्यंत मुदतवाढ दिली. राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक, पुणे यांच्याकडे मे मध्ये ही फाईल तयार झाली..पण…ती आँगस्ट संपला तरी मंत्रालयापर्यंत का पोहचलीच नाही? पुणे ते मुंबई या प्रवासाला तीन महिने का लागतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.