उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असतानाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या निकालावरून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला असून निवडणूक आयोगाचा निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता पवारांनी केलेल्या विधानवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहिर केले. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाच्या वादात आपण पडणार नाही, अशी थेट प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो असे स्पष्ट करत यावर अधिक बोलण्याचे टाळले.
निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्याचा निकाल जाहिर केल्यानंतर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, एकदा निकाल दिल्यानंतर त्यावर चर्चा होत नसते. त्यामुळे नवे पक्ष नाव आणि चिन्ह घेऊन निवडणूकीला सामोरे जायचे असते. लोक फार तर १५ दिवस महिनाभर चर्चा करतात आणि त्यानंतर नवं निवडणूक चिन्ह स्विकारतात असे सांगत इंदिरा गांधी आणि त्यावेळच्या पक्षातील नेत्यांशी वाद झाला. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या चिन्हावर आणि नावार दावा केला. मात्र आयोगाने त्यांना त्यावेळचे काँग्रेसचे चिन्ह दिले नाही. त्यामुळे त्यांनी हात हे चिन्ह स्विकारत निवडणूकीला सामोरे गेल्याची आठवणही करून दिली होती.