राज्यातील कोकण विभागातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही ठिकाणी गारा बरसल्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारकडून काय मदत जाहिर करणार अशी विचारणा करण्यात आला त्यावर उत्तर देताना म्हणाले, अवकाळी पाऊस हा राज्यातील काही थोड्या भागात पडला आहे. मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे.
दरवर्षी होळी सणानिमित्त उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या नागपूरातील घरी राहुन सण साजरा करत असत. मात्र यावेळी अर्थसंकल्पिय अधिवेशन असल्याने देवेंद्र फडणवीस हे वांद्रे येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित धुलिवंदन कार्यक्रमास हजर राहीले होते. त्यावेळी काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान भरपाईबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी वरिल वक्तव्य केले.
मला एक-दोन लोकांनाच सल्ला द्यायचाय की उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही शिमगा करण्याची पद्धत आहे. पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. मला त्यांना सांगायचंय की एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम आहे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
तसेच अर्थसंकल्पाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या प्रकारे वेगवेगळ्या रंगांनी ही होळी साजरी केली जाते, त्याचप्रकारे आमचा अर्थसंकल्पही वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगला असेल. सगळ्यांना त्यांचे रंग त्यात पाहायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल असे सांगितले.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/exUzWusEjl
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 7, 2023