मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा वादग्रस्त उद्योगपती अदानी समुहाला दिली. ही निविदा फक्त अदानीला मिळावी यासाठी राज्य सरकारने काही नव्याने अटी घातल्या. तसेच अदानी समुहाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होण्यासाठीच या अटींचा समावेश करण्यात आल्यावरून आरोप-प्रत्यारोप फेरी झडत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसाठी मोर्चा काढत भाजपावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपाने “कदाचीत सेटलमेंट झाली नसावी म्हणून मोर्चा” काढला असल्याची खोचक टीका केली.
भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पलटवार करताना म्हणाले की, मोर्चा आम्ही काढला पण सेटलमेंट करायला भाजपा कुठे होती असा टोमणा लगावत भाजपा मोर्चात सोबत असती तर सेंटलमेंट करता आली असती. परंतु भाजपा आली नाही म्हणून सेटलमेंट झाली नाही असा खोचक टोलाही लगावला.
तसेच आम्ही अदानीला काही प्रश्न विचारले तर भाजपाचे चमचे का वाजू लागले असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
त्यानंतर भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर दाऊदबरोबर संबध असल्याने त्यांच्यावर भाजपाने देशद्रोही असल्याचा आरोप करत तुरुंगात पाठविले. आता तेच नवाब मलिक त्यांच्यासोबत गेल्याने तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे भाजपाने मलिकांवरील आरोपाचे डाग धुण्यासाठी कोणती वॉशिंग मशीन वापरली, की वॉशिंग पावडर वापरली असा उपरोधिक सवाल करत जे आरोप मलिकांवर आहेत, तशाच पध्दतीचे आरोप अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांच्यावरही आहेत. त्या अनुशंगाने एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणाले होते की, कुछ लोक मिरची का व्यापार करते है, तो कुछ लोग मिर्ची के साथ व्यापार करते है असे म्हणाल्याची आठवण करून देत भाजपाबरोबर जाताच त्यांच्यावरील डाग घालविण्यासाठी कोणत्या कंपनीची वॉशिंग पावडर वापरली असा खोचक सवालही भाजपाला केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, जे जे भाजपाला सोईचे असते त्यासाठी त्यांनीच आरोप केलेले लोक सत्तेत सोबत आले तरी चालतात. मात्र आरोप ज्यांच्यावर झाले ते लोक जर दुसऱ्यांसोबत गेले तर भाजपाला चालत नाही अशी टीकाही केली.
तसेच मुंबईत झालेल्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यावरून सध्या सुरु असलेल्या आरोपांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नुकतेच काही जण सलिम कुत्ता यांच्याबरोबर पार्टीत काही जण नाचत असल्याचा आरोप करत देशद्रोह्यांशी संबध जोडण्याचा प्रयत्न केला. पण आरोप करणाऱ्यांच्याच पक्षांचे मंत्रीही सलिम कुत्ता याच्यासोबत नाचताना दिसल्यावर मात्र सत्तेतील मंत्र्याची नावे मात्र घेण्याची हिमंत झाली नाही. त्यातच महाविकास आघाडीतील आमचे सहकारी असलेल्या काँग्रेसने ज्या सलिम कुत्ता याची यापूर्वीच हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आणली. त्यामुळे तो जिवंत आहे की त्याची हत्या झाली आहे यावरील माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगावे अशी मागणीही केली.
यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, शर्मिला ठाकरे यांचे धन्यवाद असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.
?विधानभवन नागपूर – #LIVE । महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २०२३ | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद ⬇️ https://t.co/OydGkRp54m
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 18, 2023