भाजपाच्या चुकीच्या धोरणांना व दडपशाहीला देशातील जनता कंटाळली असून आता हळूहळू ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये नागपूरकरांनी भाजपला सपशेल नाकारले आहे असा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या नागपूर येथील पराभवावर जोरदार टीका केली.
महेश तपासे म्हणाले, महाराष्ट्रात कूटनीतीच्या माध्यमातून भाजपाने शिवसेनेमध्ये बंड घडवून आणले आणि सत्तापरिवर्तन केले हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही.
मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या महापालिकेतील सेवेचा राजीनामा हा उच्च न्यायालयातून मंजूर करावा लागतो एवढं दडपण शिंदे – फडणवीसांनी अधिकाऱ्यांवर आणले होते. त्यातून अतिशय गलिच्छ पातळीचे राजकारणही शिंदे व फडणवीस यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
नागपूर जिल्ह्याचा हा निकाल महाराष्ट्रातील भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांची नांदी आहे व संविधानावर विश्वास ठेवणारी महाराष्ट्रातील जनता मतदानाच्या रूपाने स्वतःला व्यक्त करत आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला…
देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंड असलेल्या नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने ट्वीटरवर एक फोटो शेअर करून देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर पेजवर नागपूरमधील खड्ड्यांची दुरावस्था झालेला एक फोटो शेअर करुन मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा करता मग याही खड्डयांबाबत बोला अशी विचारणा करण्यात आली आहे.
मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी योजना जाहीर केली. आता त्यांनी नागपूरकडेही लक्ष द्यावं. नागपूरमधली ही खड्ड्यांची रांगोळी!
फोटो सौजन्य : @mataonline pic.twitter.com/JZtzAnl27U— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 16, 2022